Bachchu Kadu | विधानपरिषदेत (Maharashtra Legislative Council) बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडत आक्रमक भूमिका घेतली. ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मानधनासंदर्भात सभागृहात चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी हा प्रस्ताव सादर केला. याप्रकरणी सभापतींनी संबंधित विभागाकडून खुलासा मागवण्याचे निर्देश दिले आहेत.
संगणक परिचालकांच्या मानधनावरून वाद :
विधिमंडळ अधिवेशनादरम्यान ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या वेतनवाढीचा तसेच खासगी कंपन्यांकडून दिल्या जाणाऱ्या पॅकेजचा मुद्दा बच्चू कडू यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात संगणक परिचालक दरमहा 50 हजार रुपये कमावत असल्याचे सांगितले होते. मात्र, हा दावा वस्तुस्थितीशी विसंगत असून सभागृहाची दिशाभूल करणारा असल्याचे कडू यांनी ठामपणे म्हटले.
या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये अधिवेशनात तीव्र शाब्दिक चकमक झाली होती. ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती. इतकेच नव्हे, तर मंत्री गोरे यांचा दावा खरा ठरल्यास आपण मिशी काढून टाकू, असेही त्यांनी जाहीरपणे म्हटले होते. त्यानंतर आता त्यांनी हा वाद थेट हक्कभंग प्रस्तावापर्यंत नेला आहे.
Bachchu Kadu | सभापतींकडून विभागाला खुलाशाचे आदेश :
मंत्री जयकुमार गोरे यांनी वारंवार चुकीची माहिती देत सभागृहाची दिशाभूल केली असून संगणक परिचालकांना कमिशनच्या स्वरूपात पगार दिला जातो, असा चुकीचा दावा केला, असे कडू यांनी सभागृहात नमूद केले. प्रत्यक्षात ग्रामपंचायतींकडूनच संबंधित कर्मचाऱ्यांचे मानधन दिले जाते, असा त्यांचा दावा आहे.
बच्चू कडू आणि जयकुमार गोरे यांच्यातील मतभेद यापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या काळातही समोर आले होते. माण-खटाव मतदारसंघातून उमेदवार देण्याच्या घोषणेनंतर दोघांमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळाले. आता त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटत आहेत.
दरम्यान, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधित विभागाकडून सविस्तर खुलासा मागवला आहे. विभागाचे स्पष्टीकरण प्राप्त झाल्यानंतरच हक्कभंग प्रस्तावाबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.






