Dhananjay Munde | राज्यात मोठी राजकीय घडामोड घडली असून अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला, आणि तो स्वीकारण्यात आला आहे.
काल रात्री देवगिरी बंगल्यावर (Ajit Pawar’s Official Residence) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत प्रथम उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील तिथे उपस्थित होते. याच बैठकीत धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आले आणि आज त्यांनी तो दिला.
अजित पवारांचा पत्रकारांवर संताप
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया मात्र संतापजनक होती. पत्रकारांनी त्यांना राजीनाम्याबद्दल विचारले असता, ते काहीसे चिडल्याचे दिसून आले.
अजित पवार म्हणाले की “तुम्हाला काहीच माहिती नाही… उगीच काही प्रश्न मला विचारू नका… मी विधानभवनात चाललोय… तिथे गेल्यावर सांगतो काय ते…”. अजित पवार यांच्या चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे भाव दिसले नाहीत आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर अधिक भाष्य करणं टाळलं.
राजीनाम्यानंतर पुढे काय?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ajit Pawar Group) अंतर्गत आणि महायुती सरकारमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. विरोधक आधीपासूनच या प्रकरणावर आक्रमक होते आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांवर धनंजय मुंडेंना वाचवण्याचा आरोप केला होता. आता पुढील विधानसभा अधिवेशनात यावर चर्चा रंगणार असून, अजित पवारांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






