Rohit Pawar | अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यात विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. काहींनी अपघातावर संशय व्यक्त केला, तर काही ठिकाणी अजितदादा जिवंत असल्याच्या अफवाही पसरल्या. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण घटनाक्रमावर स्पष्ट भूमिका मांडली आणि भावनिक खुलासे केले. (Ajit Pawar Plane Crash)
‘मला लोकांना एवढंच सांगायचं आहे…’ :
रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, “आज अजितदादा हयात नाहीत, पण ते विचारांनी आपल्यासोबत आहेत.” सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांमुळे अनेक लोक संभ्रमात असल्याचं त्यांनी सांगितलं. विमानात सहा प्रवासी होते, त्यापैकी सहावे व्यक्ती अजित पवारच होते आणि अपघाताची घटना खरीच असल्याचं त्यांनी ठामपणे स्पष्ट केलं.
रोहित पवारांनी सांगितलं की, पिंपरी-चिंचवडमध्ये सिग्नलवर उभा असताना एका रिक्षाचालकाने त्यांना अजितदादांबद्दल विचारलं. अनेकांनी भावनिक व्हिडीओ पोस्ट करत “दादा परत येतील” अशा प्रतिक्रिया दिल्या, मात्र ही घटना खरी असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असं त्यांनी लोकांना आवाहन केलं. “दादा आज आपल्यात नसले तरी त्यांच्या विचारांनी ते कायम आपल्यासोबत आहेत,” असं त्यांनी सांगितलं.
Rohit Pawar | जळालेलं स्वेटर, चप्पल आणि थांबलेलं घड्याळ… :
अपघातानंतर अनेक दिवस आपल्याला हे सर्व एखादं वाईट स्वप्न वाटत होतं, असं सांगत रोहित पवार भावुक झाले. मात्र जेव्हा त्यांनी अजितदादांचा जळालेला स्वेटर, चप्पल आणि घड्याळ पाहिलं, तेव्हा वास्तव समोर आलं. अजितदादा रोज घड्याळ घालत असत आणि ते साधारण 15 मिनिटे पुढे असायचं. अपघातानंतर ते घड्याळ 9 वाजता थांबलेलं पाहून आपल्याला खात्री पटली की अजितदादा आता हयात नाहीत, असं त्यांनी सांगितलं. (Ajit Pawar Plane Crash)
रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, “आम्ही सरकारमध्ये नसतानाही जे शक्य होतं ते केलं. अजितदादा आणि साहेबांनी नेहमी प्रयत्न करत राहा असंच सांगितलं. म्हणूनच लोकांना सत्य कळावं म्हणून ही माहिती गोळा केली.” अपघातामागचं सत्य समोर यावं आणि गैरसमज दूर व्हावेत, हाच आपला उद्देश असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.






