Ahilyanagar Fire Tragedy | अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा परिसरात रविवारी मध्यरात्री एक हृदयद्रावक घटना घडली. कालिका फर्निचर नावाच्या दुकानात लागलेल्या भीषण आगीत रासने कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या या आगीत कुटुंब गाढ झोपेत असताना धुरामुळे गुदमरून ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
नेमके काय घडले? :
कालिका फर्निचर हे दुकान जवळपास ५ हजार चौरस फूट जागेत वसलेले होते. दुकानात लाकडी फर्निचर, सोफा, फ्रीज, कूलर, खुर्च्या, शोकेस अशा मोठ्या प्रमाणात ज्वलनशील वस्तू होत्या. मध्यरात्रीच्या वेळी अचानक आग लागल्याने काही मिनिटांतच दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. (Ahilyanagar Fire Tragedy)
दुकानाच्या वरच्या मजल्यावर रासने कुटुंब वास्तव्याला होते. धुराचे लोळ घरात शिरल्याने श्वास कोंडून कुटुंबातील पाच जण जागेवरच ठार झाले. या मृतांमध्ये मयूर अरुण रासने (४५), त्यांची पत्नी पायल (३८), दोन चिमुकले अंश (१०) आणि चैतन्य (७), तसेच वृद्ध सिंधुबाई चंद्रकांत रासने (८५) यांचा समावेश आहे.
Ahilyanagar Fire Tragedy | तातडीचे मदतकार्य आणि तपास :
घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल तातडीने दाखल झाले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात आली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. या दुर्घटनेत यश किरण रासने (२५) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या दुर्घटनेतून मयूर रासने यांचे आई-वडील बचावले कारण ते मालेगाव येथे नातेवाईकांकडे गेले होते. पोलिसांनी या आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू केला आहे.
परिसरात शोककळा :
एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा करुण अंत झाल्याने संपूर्ण नेवासा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लहान मुलांसह आई-वडील आणि वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. (Ahilyanagar Fire Tragedy)
या भीषण दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.






