Abhijeet Dipke | कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावर राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले होते. धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलनाला विराम मिळाला असला, तरी NALSAR युनिव्हर्सिटी ऑफ लॉ (NALSAR University of Law) संदर्भातील नव्या वादामुळे पुन्हा खळबळ निर्माण झाली आहे. आता सीजेपीकडून भाजपचे राज्यसभा खासदार मनन कुमार मिश्रा (Mannan Kumar Mishra) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरून निर्माण झालेला वाद :
नीट पेपरफुटीविरोधात कॉकरोच जनता पार्टीने देशभरात आंदोलन छेडले होते. या आंदोलनाचा परिणाम म्हणून तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागल्याचा दावा करण्यात आला. त्यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. मात्र, त्यानंतर NALSAR युनिव्हर्सिटी ऑफ लॉच्या दीक्षांत समारंभासाठी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत (Surya Kant) यांना निमंत्रण दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले. या प्रकरणामुळे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत घेतलेल्या निर्णयावरही प्रश्न उपस्थित झाले.
आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची चौकशी करण्यासोबतच त्यांना वकील म्हणून नोंदणी करण्यापासून रोखण्याचा निर्णय बार कौन्सिल ऑफ इंडियाकडून घेण्यात आला होता. या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली. कॉकरोच जनता पार्टीने त्याला तीव्र विरोध करत पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. त्यानंतर बार कौन्सिलने विद्यार्थ्यांच्या नोंदणीबाबतचा पूर्वीचा निर्णय मागे घेतला. आता स्टेट बार कौन्सिल्सना संबंधित विद्यार्थ्यांची वकील म्हणून नोंदणी करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
Abhijeet Dipke | मनन कुमार मिश्रा यांच्या राजीन्याची मागणी :
बार कौन्सिल ऑफ इंडियाने निर्णय मागे घेतल्याची माहिती त्याचे अध्यक्ष आणि भाजपचे राज्यसभा खासदार मनन कुमार मिश्रा यांनी एक्सवर दिली. त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास (Saurav Das) यांनी हा तरुणांसाठी आणखी एक महत्त्वाचा विजय असल्याचे म्हटले. मात्र, या प्रकरणातील लढा अद्याप संपलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सीजेपीकडून पुढील कोणती भूमिका घेतली जाणार, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांच्या प्रतिक्रियेनंतर अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांनी एक्सवर पोस्ट करत मनन कुमार मिश्रा यांच्या राजीन्याची मागणी करण्याची वेळ आली आहे का, असा थेट सवाल केला. त्यावर सौरव दास यांनी मनन कुमार मिश्रा यांच्याशी संबंधित काही बाबी समोर येत असून त्या गंभीर आणि चिंताजनक असल्याचे म्हटले. अशा परिस्थितीत मनन कुमार मिश्रा यांनी तातडीने पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. लोकशाही व्यवस्थेत अशा प्रकारच्या परिस्थितीत राजीनामा देणे अपेक्षित असल्याचेही त्यांनी नमूद केले.






