8th Pay Commission | केंद्र सरकारकडून लाखो कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. 8 व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) टर्म्स ऑफ रेफरेंसला मंजुरी मिळाली असून, त्यामुळे पगार रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाचे काम सुरु झाले आहे.
येत्या काही महिन्यांत हा आयोग कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनसंदर्भात शिफारशी सादर करणार आहे. त्यापूर्वी आयोग कर्मचारी, निवृत्तीधारक आणि इतर संबंधित पक्षांची मते जाणून घेणार आहे. या शिफारशींमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. (8th Pay Commission)
फिटमेंट फॅक्टर ठरणार निर्णायक :
प्रत्येक वेतन आयोगाप्रमाणेच या वेळीही फिटमेंट फॅक्टर हा पगार निश्चित करण्याचा महत्त्वाचा घटक ठरणार आहे. फिटमेंट फॅक्टर म्हणजे जुन्या मूळ वेतनाचा गुणाकार करून नवीन वेतन ठरविणारी संख्या. तज्ज्ञांच्या मते, यावेळी फिटमेंट फॅक्टर 1.8 ते 2.46 या दरम्यान असू शकतो.
जर 1.8 चा फॅक्टर लागू झाला, तर सध्या 18,000 रुपये बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढून 32,400 रुपये होईल. म्हणजेच पगारात जवळपास 80% वाढ होऊ शकते. मात्र, नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर महागाई भत्ता (DA) शून्य केला जातो, ज्यामुळे कर्मचारी संभ्रमात आहेत. (8th Pay Commission)
8th Pay Commission | DA शून्य होईल पण नुकसान नाही :
सध्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतनासोबत 58% महागाई भत्ता आणि HRA मिळतो. पण नवीन वेतन आयोग लागू झाल्यावर DA रीसेट होऊन शून्य होतो. कारण वाढीव मूळ वेतनात DA समाविष्ट केला जातो. याचा अर्थ असा की कर्मचाऱ्यांचे एकूण उत्पन्न कमी होणार नाही, उलट वेतन रचना अधिक स्थिर आणि मजबूत बनेल.
नवीन पगार रचनेनुसार वाढीव मूळ वेतनावरून HRA, प्रवास भत्ता आणि पेन्शन निश्चित केली जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील वाढ आणि सेवानिवृत्तीच्या फायद्यावरही सकारात्मक परिणाम होणार आहे.
पेन्शनधारकांनाही मिळणार लाभ :
8 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी केवळ नोकरदार वर्गापुरत्याच मर्यादित राहणार नाहीत. पेन्शनधारकांची निवृत्ती रक्कमही नव्या बेसिक पेच्या आधारावर पुन्हा मोजली जाणार आहे. त्यामुळे निवृत्तीधारकांच्या पेन्शनमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे.
एकंदरीत पाहता, DA शून्य झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार नाही, कारण ती रक्कम आता मूळ वेतनाचा भाग म्हणून मिळेल. उलट नवीन पगाररचनेमुळे त्यांच्या वेतन, भत्ते आणि निवृत्तीवेतनात दीर्घकालीन फायदा होईल.






