India Squad | श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघाची घोषणा करण्यात आली असून 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंना यावेळीही संधी मिळालेली नाही. रणजी ट्रॉफीतील कामगिरी, आंतरराष्ट्रीय अनुभव आणि सातत्यपूर्ण प्रदर्शन असूनही चार खेळाडू संघाबाहेर राहिले आहेत.
आकिब नबी, शमीला पुन्हा संधी नाही :
संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूंच्या यादीत आकिब नबीचे (Aqib Nabi) नाव आघाडीवर आहे. मागील रणजी हंगामात त्याने गोलंदाजीत प्रभावी कामगिरी करत तब्बल 60 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. या प्रदर्शनानंतर त्याला इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळण्याची संधी मिळाली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने विकेट्स घेऊनही कसोटी क्रिकेटमध्ये त्याला अद्याप प्रत्यक्ष पदार्पणाची संधी मिळालेली नाही.
अफगाणिस्तान (Afghanistan) विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आकिब नबीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, त्या मालिकेत त्याला अंतिम संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर त्याला संघातून बाहेर करण्यात आले. आता श्रीलंका दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या 15 सदस्यीय संघातही त्याचे नाव नसल्याने रणजीतील त्याची प्रभावी कामगिरी असूनही कसोटी संधीची प्रतीक्षा कायम आहे. दुसरीकडे, अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याच्याकडेही पुन्हा एकदा दुर्लक्ष झाले आहे. शमीचा सध्याचा फॉर्म चांगला असला तरी त्याच्या फिटनेसशी संबंधित प्रश्न कायम आहेत. त्यामुळे आगामी काळात त्याचे भारतीय कसोटी संघात पुनरागमन होणे कठीण असल्याचे दिसत आहे.
India Squad | सरफराज आणि शाहबाजही संघाबाहेर :
सरफराज खान (Sarfaraz Khan) यालाही श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी संघात स्थान मिळालेले नाही. त्याने भारताकडून आतापर्यंत सहा कसोटी सामने खेळले आहेत. या सहा सामन्यांमध्ये त्याने 37.10च्या फलंदाजीच्या सरासरीने 371 धावा जमा केल्या आहेत. त्याच्या नावावर एक शतक आणि तीन अर्धशतकेही आहेत. मात्र, 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) खेळलेला कसोटी सामना त्याचा भारतासाठीचा अखेरचा सामना ठरला. त्यानंतरपासून तो संघाबाहेर असून आता श्रीलंका मालिकेसाठीही त्याची निवड झालेली नाही.
बंगालचा (Bengal) अष्टपैलू खेळाडू शाहबाज अहमद (Shahbaz Ahmed) याच्याबाबतही अशीच परिस्थिती आहे. रणजी ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी करूनही त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले नाही. बंगालकडून खेळताना त्याने आठ सामन्यांत तब्बल 39 विकेट्स घेतल्या आहेत. गोलंदाजीसोबत फलंदाजीतही त्याने योगदान दिले असून 40च्या सरासरीने 434 धावा केल्या आहेत. त्याची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील फलंदाजीची सरासरीही 40पेक्षा अधिक आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमधील या कामगिरीनंतरही श्रीलंका दौऱ्यासाठी त्याची निवड न झाल्याने चार खेळाडूंच्या संधीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.






