हिंजवडी आयटी पार्कजवळ भीषण अपघात; 20 वर्षीय तरुणीचा मृत्यू

On: November 18, 2025 11:29 AM
Hinjawadi Accident
---Advertisement---

Hinjawadi Accident | हिंजवडी आयटी पार्क परिसरात सोमवारी घडलेल्या भयानक अपघाताने पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर प्रकाश टाकला आहे. पुनावळे रोडवरील लाइफ रिपब्लिक सोसायटीसमोर डंपरच्या जोरदार धडकेने 20 वर्षीय तन्वी सिद्धेश्वर साखरे हिचा (Tanvi sakhare) जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली असून सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. (Hinjawadi IT Park accident)

अपघाताच्या वेळी तन्वी आपल्या वडिलांसोबत दुचाकीवरून जात होती. दुचाकी ती स्वतः चालवत होती, तर तिचे वडील मागे बसले होते. अचानक मागून आलेल्या डंपरने वेगात धडक दिल्याने बापलेक दोघेही रस्त्यावर फेकले गेले. तन्वी थेट डंपरच्या पुढच्या चाकाखाली गेली आणि काही क्षणांतच तिचा मृत्यू झाला. तिचे वडील थोडक्यात बचावले, मात्र धक्क्यातून अद्याप सावरू शकले नाहीत.

डंपर चालक फरार, पोलिसांची तात्काळ कारवाई :

अपघातानंतर डंपर चालकाने वाहन थांबवण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढल्याने नागरिक अधिक संतापले. उपस्थितांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. हिंजवडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधमोहीम सुरू केली आणि अनेक तासांच्या तपासानंतर आरोपी चालक अजय ढाकणे याला अखेर अटक करण्यात आली. या तात्काळ कारवाईचे कौतुक झाले असले तरी नागरिकांच्या मते हा फक्त उपचारात्मक उपाय असून मूळ समस्या अद्याप सुटलेली नाही. (Hinjawadi IT Park accident)

स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या नाराजीनुसार, हिंजवडी परिसरात गेल्या काही महिन्यांत RMC ट्रक, डंपर आणि इतर जड वाहनांची गर्दी प्रचंड वाढली आहे. सकाळ-संध्याकाळ आयटी पार्कला जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांच्या वेळी या वाहनांचा बेदरकार वेग आणि वाहतूक नियमांकडे केलेले दुर्लक्ष ही मोठी समस्या झाली आहे. वाहतूक पोलिसांची उपस्थितीही अत्यल्प असल्याने अपघातांची मालिका सुरूच असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

Hinjawadi Accident | गेल्या 11 महिन्यांत सात महिलांचा मृत्यू; ठोस उपाययोजनांची मागणी :

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 11 महिन्यांत याच प्रकारच्या RMC आणि डंपर वाहनांच्या अपघातांत तब्बल सात महिलांनी प्राण गमावले आहेत. अनेकदा तक्रारी केल्यानंतरही प्रशासकीय पातळीवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. त्यातच आयटी पार्क परिसरातील वाढती वर्दळ आणि रोड रूंदीकरणातील विलंब या समस्या अधिक गंभीर बनवत आहेत.

तन्वी साखरेच्या मृत्यूने पुन्हा एकदा हिंजवडीतील वाहतूक व्यवस्थेचे भयावह वास्तव समोर आले आहे. मोठ्या वाहनांच्या अनियंत्रित वाहतुकीवर आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या नाहीत, तर अशा अपघातांची पुनरावृत्ती होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. रस्ते सुरक्षित होण्यासाठी वाहतूक व्यवस्था मजबूत करणे, जड वाहनांसाठी नियोजित वेळा निश्चित करणे आणि पोलिसांची उपस्थिती वाढवणे यांसारख्या तातडीच्या पावलं उचलण्याची मागणी जोर धरत आहे.

News Title: 20-Year-Old Woman Killed in Hinjawadi Accident; Heavy Vehicle Traffic Under Scrutiny

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now