Shivsena | 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्यापासून दोन्ही गटांमधील संघर्ष कायम चर्चेत आहे. उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांदरम्यानच, आता पुन्हा एकदा दोन्ही शिवसेना एकत्र येतील का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यातच शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.
शिंदे सेना-मनसे युतीवरही भाष्य :
गुलाबराव पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “राजकारणात काहीही होऊ शकतं. कोण कधी कुणासोबत जाईल, हे ठामपणे सांगता येत नाही. आता दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत. त्यामुळे भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.”
त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा महाभूकंप होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Gulabrao Patil | राजकारणात काहीही शक्य? :
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे सेना आणि मनसे यांच्यात झालेल्या युतीवर भाष्य करताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “राजकारणात भूमिका लवचिक असतात. कोणत्या भूमिकेमुळे फायदा होतो, हा संबंधित पक्षाचा प्रश्न असतो.” त्यांनी मीरा-भाईंदरमध्ये शिवसेना-काँग्रेस एकत्र येण्यावरही प्रतिक्रिया देत, “सध्या राजकारणात काहीही घडत आहे,” असे म्हटले.
सध्याच्या घडामोडी पाहता सत्ता स्थापनेसाठी कोणतीही युती शक्य असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट पुन्हा एकत्र येतील का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.






