Pune IMD Weather Update | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि कोकण किनारपट्टीवर सर्वाधिक परिणाम जाणवतो आहे. या पावसामागचं खरं कारण नेमकं काय, याचा खुलासा पुणे हवामान खात्याच्या तज्ञांनी केला आहे. (Pune IMD Weather Update)
कमी दाबाचे क्षेत्र आणि सक्रिय मान्सून :
पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितलं की, मध्य-पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अचानक वाढलं आहे. याच वेळी मान्सूनचे वारेही सक्रिय झाले असून उत्तर कोकण ते केरळपर्यंत द्रोणी रेषा (Trough Line) तयार झाली आहे. यामुळे कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाची परिस्थिती आहे, तर उर्वरित राज्यात रिमझिम आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो आहे.
हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे की, पुढील दोन दिवस मुंबई व कोकण किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. घाटमाथ्यांवरही रेड अलर्ट असून, समतल भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाड्यात आज ऑरेंज अलर्ट असून, उद्यापासून तिथे यलो अलर्ट असेल. विदर्भातही आज ऑरेंज आणि उद्या यलो अलर्ट दिला गेला आहे. बुधवारपासून पावसाचा जोर काहीसा कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Pune IMD Weather Update | मुख्यमंत्री फडणवीसांचा आढावा :
राज्यभरात सुरू असलेल्या पावसाची आणि पूरस्थितीची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागात बैठक घेतली. त्यांनी जिल्हाधिकारी आणि आयुक्तांशी संवाद साधून नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर आणि पूरग्रस्तांना मदत यावर भर दिला. सरकारचे लक्ष पुढील 48 तासांवर असून, या काळात अधिक सतर्क राहण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. (Pune IMD Weather Update)
मुंबई आणि आसपासच्या भागांत सध्या रस्ते, रेल्वे मार्ग जलमय झाले आहेत. त्यामुळे महापालिका व प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. पूरग्रस्त भागांत बोटीद्वारे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.






