Sanjay Raut | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवू शकणारी घडामोड समोर आली आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत मिळाले असून, यामुळे सत्ताधारी महायुतीची डोकेदुखी वाढणार असल्याचं चित्र आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेटपणे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत माहिती दिली आहे. (Sanjay Raut Statement)
राऊत यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेलं ठाकरे बंधूंचं एकत्र येणं अखेर प्रत्यक्षात उतरणार असल्याचं संकेत मिळत असून, ही युती केवळ भावनिक नाही तर रणनीतिक असल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीला शह देण्यासाठी ठाकरे कुटुंबाने ही मोठी खेळी खेळल्याचं बोललं जात आहे.
23 तारखेपूर्वी ऐतिहासिक युतीची घोषणा :
संजय राऊत (sanjay raut) यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्याआधीच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. “दोन भावांचं मनोमिलन झालं असून, आता घोषणा ही केवळ औपचारिकता आहे,” असं स्पष्ट वक्तव्य त्यांनी केलं.
मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि कल्याण-डोंबिवली या महत्त्वाच्या महापालिकांमधील जागावाटपावर चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज दिवसभरात या चर्चांवर शेवटचा हात फिरवण्यात येणार असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी लवकरच संयुक्त घोषणा होणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं. ही युती फक्त मुंबईपुरती मर्यादित न राहता राज्यभर प्रभाव टाकणार असल्याचंही संकेत मिळत आहेत.
Sanjay Raut | “हे नाटक नाही, ठाकरे प्रितीसंगम आहे” :
नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत निवडणुकांच्या निकालांवर भाष्य करताना संजय राऊत यांनी सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली. “काही जण स्वतःच तिकिटं विकत घेऊन ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड लावतात. कालचा निकालही असाच होता. कोट्यवधी रुपये खर्च करून शो हाऊसफुल्ल दाखवण्यात आला,” असा घणाघात त्यांनी केला.
राज (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं हे कोणतंही नाटक नसून तो ‘ठाकरे प्रितीसंगम’ असल्याचं राऊत म्हणाले. महाराष्ट्राची जनता या प्रितीसंगमामध्ये सहभागी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर केल्याचा आरोप करत “हा पैसा कुठून आला?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आम्ही पैशाच्या जोरावर नव्हे, तर जनतेच्या विश्वासावर आणि ठाकरे नावाच्या ताकदीवर निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं.






