Maharashtra Cold Wave Alert | राज्यात पुन्हा एकदा कडाक्याच्या थंडीने जोर धरला असून तापमानात लक्षणीय घट नोंदवली जात आहे. उत्तर भारतातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट पसरली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
थंडी वाढत असतानाच राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये धुके आणि प्रदूषण यामुळे जनजीवनावर परिणाम होताना दिसत आहे. मुंबईत पहाटेच्या वेळी दाट धुक्याची चादर पसरत असून दृश्यमानतेत मोठी घट झाली आहे. तर पुण्यात हवेच्या गुणवत्तेने धोक्याची पातळी ओलांडल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबत चिंता वाढली आहे.
मुंबईत धुके, वाहतुकीवर परिणाम :
मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळेत दाट धुक्याचा अनुभव येत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील २४ तास मुंबईकरांसाठी अधिक थंड असणार आहेत. सध्या मुंबईचे कमाल तापमान सुमारे ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. (Maharashtra Cold Wave Alert)
विशेषतः सकाळी ५ ते ९ या वेळेत रस्ते आणि महामार्गांवरील दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे वाहतूक करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Maharashtra Cold Wave Alert | पुण्यात प्रदूषणाचा वाढता धोका :
पुणे शहरात गेल्या आठ दिवसांत हवेतील प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. हिवाळ्यातील थंड हवामान, बांधकामांची वाढती संख्या आणि वाहनांमधून होणारे उत्सर्जन यामुळे प्रदूषणाचे कण हवेत अडकून राहत आहेत. अनेक भागांमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स १८० च्या पुढे गेल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
नागरिकांकडून श्वसनास त्रास, डोळ्यांची जळजळ आणि थकवा जाणवत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत धुके आणि धुराचे मिश्रण दिसत असून तज्ज्ञांच्या मते ही स्थिती आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
8 जिल्ह्यांत थंडीचा कडाका वाढणार :
हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका अधिक वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे आणि सोलापूर या आठ जिल्ह्यांत तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून याचा परिणाम शेतीवरही होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






