Sunetra Pawar Oath | राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली असून अखेर सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पदाची शपथ दिली. यासह महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला उपमुख्यमंत्रीपदाचा मान मिळाला असून, या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचं चित्र आहे.
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत मोठी चर्चा सुरू होती. नवे गटनेते कोण असतील आणि उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे जाणार, याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते. अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम देत सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालं आणि त्यांनी अधिकृतपणे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
राजभवनात पार पडला शपथविधी सोहळा :
राजभवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, आमदार आणि अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांनी “मी सुनेत्रा अजित पवार…” या शब्दांत शपथ दिल्यानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात महिलांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना या वेळी व्यक्त होत होती. (Sunetra Pawar Oath)
या शपथविधीपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आणि उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला. या घडामोडींमुळे पक्षात स्थैर्य निर्माण झाल्याचं मानलं जात आहे.
Sunetra Pawar Oath | राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत दोन महत्त्वाचे प्रस्ताव मांडण्यात आले होते. पहिला प्रस्ताव सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड करण्यासंदर्भात होता, तर दुसरा प्रस्ताव पक्षाशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचे अधिकार त्यांना देण्यासंदर्भात होता. या दोन्ही प्रस्तावांना उपस्थित आमदारांनी एकमताने मंजुरी दिली आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची अधिकृतपणे गटनेतेपदी निवड झाली.
गटनेतेपदी निवड झाल्यानंतर लगेचच त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याआधी त्या राज्यसभेच्या खासदार म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वगुणांचा उपयोग आता राज्याच्या कारभारात होणार असल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. महिला नेतृत्वाला मिळालेल्या या संधीमुळे राज्याच्या राजकारणात सकारात्मक संदेश गेल्याचं मानलं जात आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या पोकळीवर सुनेत्रा पवार यांनी जबाबदारी स्वीकारून पक्षाला स्थैर्य देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडून राज्याच्या विकासासाठी नवे निर्णय आणि ठोस पावलं उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या शपथविधीमुळे राज्याच्या राजकारणात एक नवा इतिहास घडल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे.






