Stress Management | आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत तणाव हा अनेकांच्या आयुष्याचा भाग बनला आहे. कामाचा वाढता दबाव, भविष्याबाबतची अनिश्चितता आणि वैयक्तिक नात्यांमधील गुंतागुंत यामुळे मनावर ताण निर्माण होतो. हा तणाव दीर्घकाळ टिकल्यास त्याचा परिणाम शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे मानसिक संतुलन राखण्यासाठी काही प्रभावी सवयी अंगीकारणे आवश्यक ठरते.
मन शांत ठेवण्यासाठी दैनंदिन सवयी महत्त्वाच्या :
तणाव किंवा रागाच्या प्रसंगी त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी काही क्षण स्वतःला थांबवणे फायदेशीर ठरते. अशावेळी खोल श्वास घेण्याचा सराव मनाला स्थिर ठेवण्यास मदत करतो. चार सेकंद श्वास आत घेणे, सहा सेकंद तो रोखून ठेवणे आणि आठ सेकंदांत श्वास बाहेर सोडणे ही पद्धत नियमित केल्यास मनातील अस्वस्थता कमी होण्यास मदत मिळू शकते. यामुळे मज्जासंस्था शांत राहते आणि निर्णयक्षमता सुधारते.
याशिवाय वर्तमान क्षणात जगण्याची सवय लावणेही तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. अनेकदा भूतकाळातील घटना किंवा भविष्यातील काळजी यामुळे मन अधिक अस्थिर होते. जेवण, चालणे किंवा दैनंदिन कामे करताना त्या क्षणाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केल्यास मन अधिक केंद्रित राहते. त्याचबरोबर दिवसाची सुरुवात नियोजनाने केल्यास कामांचा ताण कमी होतो. महत्त्वाच्या कामांची यादी तयार करून ती प्राधान्याने पूर्ण केल्याने गोंधळ टाळता येतो.
Stress Management | आहार, झोप आणि सकारात्मक विचारांची साथ :
मानसिक तणावाच्या काळात शरीरातील कॉर्टिसोल हार्मोनचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटते. अशा वेळी पुरेसे पाणी पिणे आणि फळे, सॅलड, ओट्स तसेच सुकामेवा यांसारख्या पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. उलट जंक फूड आणि जास्त प्रमाणातील कॅफीनचे सेवन टाळल्यास शरीरावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
तणावावर मात करण्यासाठी सकारात्मक विचारसरणीही महत्त्वाची भूमिका बजावते. स्वतःशी सकारात्मक संवाद साधल्याने नकारात्मक विचारांचे प्रमाण कमी होऊ शकते. तसेच दररोज काही वेळ निसर्गाच्या सान्निध्यात घालवल्यास मन प्रसन्न राहते. उद्यानात फेरफटका मारणे, झाडांजवळ बसणे किंवा सूर्यप्रकाशाचा आनंद घेणे यामुळे मूड सुधारण्यास मदत होते. संशोधनानुसार निसर्गाच्या संपर्कामुळे आनंदाशी संबंधित हार्मोन्सचे प्रमाण वाढते.
याशिवाय दररोज सात ते आठ तासांची गुणवत्तापूर्ण झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी स्क्रीनपासून दूर राहणे, शांत संगीत ऐकणे किंवा ध्यानधारणा करणे यामुळे मानसिक आरोग्य अधिक चांगले राखता येते.






