Raja Raghuwanshi | मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेला असताना बेपत्ता झालेल्या इंदूर येथील राजा रघुवंशी (Raja Raghuwanshi) याची हत्या त्याच्याच पत्नीने घडवून आणल्याचे समोर आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. राजा रघुवंशी याची पत्नी सोनम आणि तिच्या प्रियकराने राजाचा काटा काढण्यासाठी रचलेल्या भयानक कटाचा आता चौकशीमधून हळूहळू उलगडा होत आहे. शिलाँग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमने पती राजा रघुवंशी याची हत्या करण्यासाठी अत्यंत धूर्तपणे कट रचला होता.
रचलेल्या भयानक कट
या कटाचे सर्वात धक्कादायक सत्य हे आहे की, जेव्हा राजाची (Raja Raghuwanshi) हत्या झाली, तेव्हा सोनमचा प्रियकर राज कुशवाह हा घटनास्थळी, म्हणजेच शिलाँगमध्ये नव्हता. सोनमने त्याच्याकडे राजाची हत्या करण्यासाठी सुपारी घेणाऱ्यांची व्यवस्था करण्याची आणि त्यांना शिलाँगला पाठवण्याची जबाबदारी सोपवली होती. तसेच, कुणाला संशय येऊ नये आणि पोलिसांकडून पकडले जाऊ नये, यासाठी सोनमने राज याला इंदूर येथेच राहण्यास सांगितले होते.
पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर राज कुशवाह हा शिलाँगला गेला असता, तर सोनमच्या कुटुंबीयांकडून काही गडबड होऊन हा कट उघडकीस आला असता. त्यामुळे सोनमने राज याला इंदूर येथेच ठेवून आकाश राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद कुर्मी या आरोपींना राजाच्या हत्येसाठी शिलाँगला पाठवले. सोनम रघुवंशी हिला ट्रान्झिट रिमांडवर घेऊन गाझीपूरहून पाटणा येथे नेताना शिलाँग पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. या चौकशीमधून तिची लबाडी आणि तिच्या सुपिक मेंदूतून शिजलेल्या या भयानक कटाची माहिती समोर आली आहे.
सोनम आणि राजा यांचा विवाह याच वर्षी एका मॅट्रिमोनियल ॲपच्या माध्यमातून ठरला होता. याच ॲपच्या माध्यमातून दोन्ही कुटुंबांची ओळख झाली होती. ११ मे रोजी सोनम आणि राजा यांचा विवाह झाला होता.
प्रकरणाचा उलगडा झाला
लग्नाला नऊ दिवस झाल्यानंतर, म्हणजेच २० मे रोजी, दोघेही हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. २३ मे रोजी नोंग्रियाट गावातील एका ‘होम स्टे’मधून बाहेर पडल्यानंतर, राजाची सोनमच्या इशाऱ्यावरून तीन जणांनी हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह वेईसावडाँग झऱ्याजवळच्या दरीत फेकून दिला. या प्रकरणाची देशपातळीवर खूप चर्चा झाल्यानंतर, तपासाची सूत्रे वेगाने फिरली. २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला, तर ९ जून रोजी सोनम रघुवंशी ही सुद्धा पोलिसांना सापडली, ज्यामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला.






