Eknath Shinde | लोकसभा अध्यक्षांनी शिंदे गटात सहा खासदारांच्या विलिनीकरणाला मंजुरी दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena UBT) पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर तसेच शिंदे गटात गेलेल्या सहा खासदारांवर जोरदार टीका केली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक गंभीर आरोप करत सत्ताधारी पक्ष आणि केंद्र सरकारवरही निशाणा साधला.
शिंदे आणि सहा खासदारांवर गंभीर आरोप :
संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत ते आचार्य विनोबा भावे (Vinoba Bhave) नसल्याचे म्हटले. दाढी असल्यामुळे कोणीही सत्यवचनी होत नाही, असा टोला लगावत त्यांनी मशाल चिन्हावर निवडून आलेले सहा खासदार 50-50 कोटी रुपये देऊन शिंदे गटाने आपल्या बाजूला वळविल्याचा आरोप केला. या सहा खासदारांना त्यांनी निर्लज्ज आणि गद्दार अशी टीकाही केली.
राऊत यांनी पुढे सांगितले की, हे खासदार शिंदे गटाच्या चिन्हावर नव्हे, तर मशाल चिन्हावर आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निवडून आले होते. त्यामुळे त्यांना दुसऱ्या गटात नेण्यात कोणतेही शौर्य, नैतिकता किंवा लोकशाही मूल्य नसल्याचे त्यांनी म्हटले. यासोबतच या प्रकरणावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
Eknath Shinde | दाढीच्या वक्तव्यासह सरकारवरही निशाणा :
टीकेची धार आणखी तीव्र करताना संजय राऊत म्हणाले की, “एक दिवस ही दाढी एखादा हनुमान येईल आणि जाळून टाकेल.” दाढीवर हात फिरवत नैतिकतेचे धडे देऊ नयेत, असा इशाराही त्यांनी एकनाथ शिंदे यांना दिला. तसेच त्यांची नैतिकता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या पायाशी पडली असल्याची टीकाही त्यांनी केली.
यावेळी राऊत यांनी भाजप (BJP), केंद्र सरकार तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावरही निशाणा साधला. सहा खासदारांच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्याचा निर्णय हा लोकशाहीची हत्या आणि अत्यंत गंभीर प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या आंदोलनाचाही उल्लेख करत देशात लोकशाही धोक्यात आल्याचे त्यांनी म्हटले. लोकसभा अध्यक्षांनी शिंदे गटात सहा बंडखोर खासदारांच्या विलिनीकरणाला मंजुरी दिल्यानंतरच त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.






