Sanjay Raut | उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा केंद्रबिंदू ठरणारे आरोप केले आहेत. मुंबईतील बेस्टच्या डेपोंच्या भूखंडावर भाजप प्रणीत बिल्डर लॉबीचा डोळा असून, भविष्यात बेस्ट तोट्यात आणून बंद पाडण्याचा डाव सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या लाडक्या बिल्डर्समार्फत या भूखंडांचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पतपेढी निवडणुकीतील पराभवाचे कारण :
बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत शिवसेना (उद्धव गट) आणि मनसे यांचे पॅनल एकत्र आले होते. मात्र या निवडणुकीत त्यांना दारुण पराभव पत्करावा लागला. राऊतांनी आकडेवारीनिशी पराभवाचे कारण सांगत भाजपवर थेट हल्ला केला.
त्यांच्या मते, एक मत तब्बल ५,००० रुपयांना विकत घेतले गेले. याशिवाय, १८०० मतं अवैध ठरवण्यात आली, ज्यातील बहुतांश मतं शिवसेनेच्या पॅनलच्या बाजूने होती. शिवाय, १,००० मतं अपक्षांनी खाल्ली असून ती अपक्ष उमेदवार भाजपने उभे केले असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला.
Sanjay Raut | बिल्डर लॉबी आणि राजकारण :
राऊत म्हणाले की, अख्खी मुंबई ही फडणवीसांच्या पंखाखालील बिल्डरांनी ताब्यात घेतली आहे. बेस्ट डेपो कुठल्या बिल्डरला द्यायचा हे आधीच ठरवले गेले आहे. शिवसेनेचा पराभव करून बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या पतपेढीवर नियंत्रण मिळवून बिल्डर्सना संधी देणे, हा भाजपचा डाव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Sanjay Raut Statement On Devendra Fadanvis)
पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले, “मिस्टर फडणवीस, शिवसेनेच्या नादाला लागू नका. तुमची सर्व अंडीपिल्ली आम्हाला माहिती आहेत.” त्यांनी छोट्या-मोठ्या बिल्डर्सच्या माध्यमातून “बिल्डर राज्य” सुरू असल्याचा आरोप केला. शिवाय, “मुंबई ही अमराठी बिल्डर्सना विकली आहे, म्हणूनच तुम्हाला ठाकरे ब्रँड नको आहे,” असा टोला लगावला.






