Sanjay Raut | राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता नगरसेवकांच्या फोडाफोडीवरून राजकीय वातावरण तापले आहे. मुंबई महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, शिवसेना शिंदे गटालाही महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. मात्र, या निकालानंतर सुरू झालेल्या हालचालींवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
संजय राऊत यांनी दावा केला की, एकनाथ शिंदे आता भाजपचेच नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे चित्र मुंबई तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेत स्पष्टपणे दिसत आहे. “आमचे नगरसेवक सुरक्षितपणे आपापल्या घरी आहेत, मग शिंदेंनी स्वतःच्या आणि भाजपच्या नगरसेवकांना कैदखान्यात का डांबले आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘शिंदेंना दिल्लीतून चावी दिली जाते’ :
राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे (Eknath shinde) आता भाजपचेच ‘लोहपुरुष’ झाले आहेत. त्यांनी आधी शिवसेना फोडली आणि आता भाजपलाच सुरुंग लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. अमित शाह त्यांना दिल्लीत खांद्यावर घेऊन फिरतात, त्यामुळे त्यांना कुणीतरी दिल्लीतून ‘चावी’ देत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
महापौरपदावर दावा सांगितल्यावरूनही राऊतांनी शिंदेंवर शंका व्यक्त केली. “जर दिल्लीतून पाठबळ नसतं, तर त्यांनी महापौरपदावर दावा केला असता का?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत, शिंदेंना दिल्लीतून चावी देणारे कोण, असा प्रश्नही विचारला.
Sanjay Raut | शिंदे-भाजपमध्येच संघर्ष होणार? :
राऊत पुढे म्हणाले की, काँग्रेसचे नगरसेवक फुटणार नाहीत, त्यामुळे आगामी काळात फोडाफोडीचा खेळ शिंदे गट आणि भाजप यांच्यातच पाहायला मिळेल. “आम्ही जेवायला जातो की ते कुठे जेवायला जातात, ते बघूया,” असा टोला लगावत, महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काळात आणखी मजा येणार असल्याचे भाकीत त्यांनी व्यक्त केले.






