Rohit Pawar on Sangram Jagtap | अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार संग्राम जगताप यांच्या अलीकडील वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. त्यांनी हिंदू समाजाला दीपावली खरेदी केवळ हिंदू दुकानदारांकडून करण्याचे आवाहन करत मुस्लिमांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नाराजी व्यक्त करत जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठा दावा करत म्हटलं आहे की, “आगामी काळात संग्राम जगताप भाजपमध्ये पक्ष प्रवेश करतील.” त्यामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.
“संग्राम जगताप आता पक्षप्रमुखांचे ऐकत नाहीत” – रोहित पवार :
रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, “संग्राम जगताप आता पक्षाच्या प्रमुखांचं देखील ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांनी आपला नेता बदलल्याचं स्पष्ट दिसतं आहे.” ते पुढे म्हणाले की, “भाजपने ‘ऑपरेशन लोटस’ पुन्हा सुरू केलं आहे. हे ऑपरेशन अजूनही संपलेलं नाही. त्याचं दुसरं सत्र आता सुरू झालं आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यांना फोडण्याचं काम सुरू आहे.”
या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांवर नवे अंदाज व्यक्त केले जात आहेत. रोहित पवारांच्या दाव्यांमुळे आगामी काळात अजित पवार गटासाठी अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Rohit Pawar on Sangram Jagtap)
Rohit Pawar on Sangram Jagtap | अजित पवारांकडून संग्राम जगतापांना नोटीस :
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही जगताप यांच्या वक्तव्यावर कठोर भूमिका घेतली आहे. “संग्राम जगताप (sangram jagtap) यांनी केलेलं वक्तव्य पक्षाच्या विचारधारेला धरून नाही. त्यामुळे आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे,” असं अजित पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “शेवटी तुम्ही एखाद्या पक्षाचे सदस्य असाल तर त्या पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात जाणं कोणताही पक्ष सहन करणार नाही. नोटीसला उत्तर आल्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ.” आता या प्रकरणावर संग्राम जगताप काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.






