BJP President Change | भाजपमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा अखेर संपली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या जागी आता मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra chavan) यांची नियुक्ती निश्चित झाली आहे. चव्हाण हे 30 जून रोजी प्रदेशाध्यक्ष पदासाठी अधिकृतपणे अर्ज दाखल करणार असून, 1 जुलै रोजी सकाळी 11 वाजता वरळी डोम येथे त्यांच्या नियुक्तीची औपचारिक घोषणा केली जाणार आहे. यावेळी भाजपचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
भाजपने संघटनात्मक पातळीवर देशभरात बदल घडवण्याची मोहीम हाती घेतली असून त्याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील नवीन नेतृत्वाची निवड होत आहे. विशेष म्हणजे, या बदलाची तयारी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडणुकीशीही निगडीत आहे. रविंद्र चव्हाण यांची निवड ही राज्यातील ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे.
राष्ट्रीय निवडणुकीसाठी संघटनात्मक हालचाली :
या निवडीसोबतच भाजपने तीन राज्यांसाठी निवडणूक निरीक्षकांचीही नियुक्ती केली आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांना महाराष्ट्रासाठी, हर्ष मल्होत्रा यांना उत्तराखंडसाठी आणि माजी मंत्री रविशंकर प्रसाद यांना पश्चिम बंगालसाठी जबाबदारी देण्यात आली आहे. हे निरीक्षक संबंधित राज्यांतील प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषद सदस्यांच्या निवडणुकीवर देखरेख करणार आहेत. (BJP President Change)
राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर ही संघटनात्मक हालचाल वेग घेत असून 15 जुलैपूर्वी नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यता आहे. गुजरात, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, त्रिपुरा आणि तेलंगणातही प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
BJP President Change | पंजाब व दिल्लीसाठी नवे अध्यक्ष लवकरच :
राष्ट्रीय नेतृत्व निश्चित झाल्यानंतर पंजाब आणि दिल्लीसारख्या महत्वाच्या राज्यांमध्येही नवीन प्रदेशाध्यक्षांची नेमणूक करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये 4 ते 11 जुलैदरम्यान नियुक्ती जाहीर होण्याची शक्यता आहे. (BJP President Change)
संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचा भाजपचा मानस आहे. हे अधिवेशन अनेक वादग्रस्त मुद्द्यांमुळे गाजण्याची शक्यता आहे आणि त्यापूर्वी संघटनात्मक स्थिरता मिळवण्यावर पक्षाचा भर आहे.






