Raj Thackeray | मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना ठाम संदेश दिला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना राज ठाकरे यांनी मुंबईत मनसेच्या प्रमुख नेत्यांशी संवाद साधत ही निवडणूक आपल्या पक्षाच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत मुंबई वाचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. मतभेद, नाराजी आणि वैयक्तिक स्वार्थ बाजूला सारून प्रत्येकाने निवडणुकीत झोकून देऊन काम करावे, असा स्पष्ट आदेश त्यांनी मनसैनिकांना दिला. मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक मनसेसाठी निर्णायक ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. (Raj Thackeray BJP Attack)
मनसेच्या उमेदवारी प्रक्रियेत गुप्तता, एबी फॉर्मद्वारे तयारी :
मुंबई महापालिका (Mumbai Mahapalika Election) निवडणुकीसाठी मनसेकडून अद्याप अधिकृत उमेदवार यादी जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र पक्षाने आपल्या संभाव्य उमेदवारांना थेट एबी फॉर्म देऊन उमेदवारी अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मनसेची रणनीती अत्यंत गुप्ततेत राबवली जात असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्पष्टपणे सांगितले की, कोणाला किती जागा मिळाल्या यावरून नाराज होण्याचे कारण नाही. मराठी माणसाच्या हितापुढे कोणाचाही वैयक्तिक स्वार्थ मोठा नाही. मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे आणि काही लोकांची मुंबई ताब्यात घेण्याची स्वप्ने उद्ध्वस्त करणे हाच आपला खरा उद्देश आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
Raj Thackeray | भाजपवर जोरदार टीका, निवडणूक अस्तित्वाची लढाई असल्याचा इशारा :
यावेळी राज ठाकरे यांनी भाजपवरही जोरदार हल्लाबोल केला. भाजप सध्या नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जोरावर माज करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्तेविना राहण्याचे प्रसंग देशाच्या इतिहासात अनेकदा आले असून, सत्तेत नसतानाही मनसेचा दबदबा कमी झालेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपमध्ये गेल्यास फायदा होईल असे अनेकांना वाटत असल्याची टीका करत, भाजपमधील अनेक लोकांवर टांगती तलवार असल्याचे राज ठाकरे म्हणाले. प्रचारसभांमध्ये आपण अनेक गोष्टी उघड करणार असल्याचे संकेत देत, ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची लढाई आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मुंबई आपल्या हातात ठेवायचीच, असा निर्धार त्यांनी मनसैनिकांना करून दिला. येत्या काही तासांत उमेदवारी अर्ज दाखल होत असताना सर्वांनी उत्साहाने आणि एकजुटीने काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.






