Vidhan Bhavan Rada | राज्याच्या विधीमंडळाच्या लॉबीत काल झालेल्या तुफान राड्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटू नये,” अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं आहे. त्याचबरोबर “थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर कारवाई करून दाखवा,” असं थेट आव्हानही दिलं आहे.
गुरुवारी विधानभवनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक आमनेसामने आले आणि प्रचंड गोंधळ घातला. या घटनेनंतर राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया उमटल्या आणि आता राज ठाकरे यांचंही ठाम विधान समोर आलं आहे.
‘काय अवस्था झालीये आपल्या महाराष्ट्राची?’ :
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित सत्ताधाऱ्यांवर आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटलं, “काल विधानभवन परिसरात कार्यकर्त्यांच्यात तुफान हाणामारी झाली. हा व्हिडीओ पाहून खरंच प्रश्न पडतो – काय अवस्था झाली आहे आपल्या महाराष्ट्राची? सत्ता हे साधन आहे, साध्य नाही, याचा विसर सत्ताधाऱ्यांना पडलेला आहे.”
ते पुढे म्हणाले, “भंपक लोकांना पक्षात घेऊन त्यांचा वापर इतर पक्षांवर गलिच्छ टीका करण्यासाठी केला जातो. आणि नंतर राजकारणात शुचिता सांगितली जाते. हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेनं ओळखायला हवं.”
Vidhan Bhavan Rada | आमच्या महाराष्ट्र सैनिकांवर तुटून पडणारे कुठे गेले? :
राज ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या भूमिकेचं समर्थन करत म्हटलं, “आमच्या पक्षावर टीका करणारे आता कुठे लपून बसलेत? मराठी भाषेसाठी जर आमचा सैनिक हात उचलतो, तर त्यावर कारवाई केली जाते. पण कालच्या घटनेतील दोषींवर कारवाई कुठे आहे? हे कार्यकर्ते मराठी माणसासाठी लढतात, व्यक्तिगत कारणांमुळे नव्हे.”
याच दरम्यान, त्यांनी आपल्या दिवंगत आमदाराचाही उल्लेख करत विधानभवनात पूर्वी घडलेल्या घटनेचं स्मरण करून दिलं, “आमच्या दिवंगत आमदाराने देखील एका आमदाराला विधानभवनात धक्का दिला होता, पण तो मराठी अपमानामुळे होता, व्यक्तिगत द्वेषातून नव्हे.” (Vidhan Bhavan Rada)
अधिवेशन म्हणजे फक्त खर्च आणि तमाशा? :
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्यातील आर्थिक संकटावरही भाष्य केलं. “अधिवेशनाच्या एका दिवसाचा खर्च दीड ते दोन कोटींचा आहे. राज्यात विकास निधी नाही, कंत्राटदारांची बिले थकली आहेत, जिल्ह्यांचा विकास थांबलेला आहे आणि अधिवेशनात हे राडे चालू आहेत. हे प्रकार माध्यमांना खाद्य देण्यासाठीच मुद्दाम घडवले जात आहेत काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.






