Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी झाल्याने तब्बल 32 तास महामार्ग ठप्प राहिला. अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, प्रवाशांना अंधारात तासन्तास अडकून पडावं लागलं, खाणं-पाणीही मिळालं नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याची थेट दखल घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे.
या घटनेनंतर सरकारकडून केवळ चौकशीचे आदेश दिले जातात, मात्र प्रत्यक्षात उपाययोजना होत नाहीत, असा सवाल करत राज ठाकरे (Raj Thackeray Statement) यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिली. मुंबई-पुणे प्रवास आता किती वेळात पूर्ण होईल याची शाश्वतीच राहिलेली नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.
“हायस्पीड ट्रेन नंतर, आधी प्रवास सुरळीत करा” – राज ठाकरे :
राज ठाकरे यांनी अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या मुंबई-पुणे हायस्पीड ट्रेनवरही अप्रत्यक्षपणे टीका केली. “ती होईल तेव्हा होईल, पण त्याआधी सध्याचा मुंबई-पुणे प्रवास तरी सुरळीत करा,” अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. 24 वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या या द्रुतगती मार्गावर आपत्ती व्यवस्थापनाचा ठोस आराखडा तयार करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. (Mumbai Pune Expressway)
त्यांनी असेही म्हटले की, टोल वसुली करण्यात सरकार तत्पर आहे, मात्र प्रवाशांना मूलभूत सुविधा आणि सुरक्षित प्रवास देण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अशा घटनांमध्ये प्रवाशांना केवळ अडकवून ठेवले जाते, पण त्यांच्यासाठी तत्काळ उपाययोजना होत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
Mumbai Pune Expressway | टोल परतावा आणि कृती आराखड्याची ठाम मागणी :
राज ठाकरे (Raj Thackeray Statement) यांनी सरकारकडे मोठी मागणी करत म्हटले आहे की, ज्या प्रवाशांकडून या काळात टोल वसूल करण्यात आला आहे, तो तात्काळ परत केला पाहिजे. तसेच, चौकशीचा फार्स न करता अशा घटनांमध्ये तात्काळ काय उपाय करायचे, याचा ठोस कृती आराखडा तयार करून तो जनतेसमोर मांडावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई आणि पुणे ही राज्याच्या विकासाची इंजिनं असल्याचे सांगितले जाते, मात्र या दोन शहरांमधील महामार्ग तब्बल 32 तास बंद राहतो आणि सरकार शांतपणे पाहत बसते, ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले आहे.






