Raj Thackeray On Vishwas Nangare Patil | नागपूर पोलीस आयुक्त म्हणून बदली झालेले विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) सध्या एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात सहभाग घेऊन त्यांनी केलेल्या स्तुतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावरून एक सविस्तर पोस्ट शेअर करत विश्वास नांगरे पाटील यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे आणि त्यांना एक महत्त्वाचे आवाहन केले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये उपस्थित केलेले मुख्य मुद्दे आणि टीका खालीलप्रमाणे आहे:
“पक्षांसमोर सद्सद्विवेक बुद्धी गहाण टाकू नका”
राज ठाकरे यांनी विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक करत त्यांना सल्ला दिला. “नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत, माझी विनंती आहे की जर तुम्ही सरकार किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात, तर त्यांना हे हवंच आहे. परंतु नांगरे पाटील, तुम्ही एक चांगले आणि कार्यक्षम अधिकारी आहात; तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक बुद्धी राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका.”
“वर्दीचा खाकी रंग पोलीस दलाचा की संघाचा?”
विश्वास नांगरे पाटील यांच्या भूमिकेवर आक्षेप घेताना राज ठाकरे म्हणाले की, ते एक पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाच्या कर्तव्याशी असायला हवी.
राजीनामा देऊन भाजपमध्ये जा: “तुम्हाला जर संघाबद्दल इतकीच आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा. जर जाहीरपणे बोलायचे असेल, तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरूच आहे, तुमचेही पुनर्वसन होईल.”
खाकी रंगावरून टोला: “नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे, तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता; तो रंग संघाच्या आधीच्या चड्डीच्या खाकीचा आहे, हे आम्हाला आत्ताच कळले.”
मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या भूमिकेवर सवाल
राज ठाकरेंनी केवळ नांगरे पाटील यांच्यावरच नाही, तर सरकारवरही निशाणा साधला आहे. दुहेरी निष्ठा कशी चालते?: “अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना कशी चालते? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला कोणताही अधिकारी गेला, तर तेव्हा बोंब मारू नका. अधिकाऱ्याच्या कृतीवर गप्प बसणे हेही एकप्रकारे तिचे समर्थनच आहे.”
२०१२ च्या ‘रझा अकादमी’ मोर्च्याची दिली आठवण
आपल्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी राज ठाकरेंनी २०१२ मधील एका घटनेचा दाखला दिला. २०१२ मध्ये जेव्हा मनसेने रझा अकादमीच्या विरोधात मोर्चा काढला होता, तेव्हा एका पोलीस कॉन्स्टेबलने मनसेच्या भूमिकेचे कौतुक केले होते. त्यावेळी तत्कालीन सरकारने ‘निष्पक्षता सोडली’ म्हणून त्या कॉन्स्टेबलला सक्तीच्या रजेवर पाठवले होते.
मग हीच भूमिका आणि हाच नियम विद्यमान सरकार विश्वास नांगरे पाटील यांच्या बाबतीत घेणार का? असा थेट सवाल राज ठाकरेंनी विचारला आहे. “जर सरकारी अधिकारीच निष्पक्ष राहिले नाहीत, तर जनतेने कोणाकडे पाहायचे?” अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
News Title: Raj Thackeray On Vishwas Nangare Patil MNS Post RSS Nagpur Event Video






