Raj Thackeray | केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह (Jitendra Singh IIT Bombay Controversy) यांनी आयआयटी मुंबईतील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वारे वाहू लागले आहेत. आयआयटी बॉम्बेचे नाव बदलून ‘आयआयटी मुंबई’ केले नाही याचा आनंद व्यक्त करत त्यांनी “देवाचे आभार मानतो” असे म्हटल्याने मोठी राजकीय चर्चा रंगत आहे. या वक्तव्यामागे कोणती मानसिकता आहे, यावर राज्यभरातील विरोधी पक्षांकडून जोरदार टीका सुरू झाली आहे. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर गंभीर आरोप करत थेट मराठी जनतेला जागं होण्याचे आवाहन केले आहे.
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी फेसबुकवर एक मोठी पोस्ट लिहून केंद्राच्या धोरणांवर हल्ला चढवला. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “मुंबई जी मराठी माणसाची होती, आहे आणि राहणार आहे, पण काहींच्या मनात तिला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव जुन्यापासून शिजत आहे.” केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याला त्यांनी या मानसिकतेचे प्रतीक ठरवत मोठी राजकीय चेतावणी दिली आहे.
“मुंबई नाव खटकतंय… मराठी माणसा जागा हो” — राज ठाकरे :
राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये जितेंद्र सिंह यांच्यावर थेट निशाणा साधत म्हटले की, “जितेंद्र सिंग यांचा ना मुंबईशी संबंध, ना महाराष्ट्राशी. ते जम्मूमधले. पण शीर्ष नेतृत्वाच्या मनात काय चालले आहे ते ओळखून त्यांनी हे बोलून दाखवले.” त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ‘बॉम्बे’ नाव टिकवण्यामागे राजकीय हेतू असू शकतो. (Mumbai vs Bombay Name Politics)
याच पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, “मुंबई हे नाव आपली मुंबा देवीवरून घेतलेले आहे. ही शहराची मूळ ओळख आहे. पण हे नावच काहींना खटकत आहे. मराठी लोक, इथे पिढ्यानपिढ्या राहणारे कुटुंब हीच या शहराची ओळख आहे. त्यांना आणि शहरालाच काहींची चीड आहे.” त्यांच्या या भाषणातून मराठी अस्मितेला पुन्हा केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो.
Raj Thackeray | “मुंबई आणि MMR ताब्यात घेण्याचा डाव सुरू” — मनसेची राजकीय चेतावणी :
राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पोस्टमध्ये केंद्र सरकारवर गंभीर आरोप करत लिहिले की, “आज चंदिगढ पंजाबच्या हातातून काढायचा प्रयत्न झाला होता. विरोध झाल्यावर सरकार मागे हटले, पण ती तात्पुरती माघार आहे. हाच डाव मुंबईच्या बाबतीतही 100% सुरू असणार.”
त्यांनी असा गंभीर दावा केला की, “मुंबई नको, बॉम्बेच हवं या नावाच्या वादातून शहराचा ताबा हळूहळू दुसऱ्यांच्या हातात देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधी मुंबई आणि मग संपूर्ण MMR परिसर गुजरातला जोडण्याची योजना शिजत आहे.” या विधानानंतर राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे.
ठाकरेंनी शेवटी मराठी जनतेला इशारा देत म्हटले की, “आज उद्योगपती, केंद्रीय हात, मोठे व्यावसायिक कोण काय ताब्यात घेत आहेत ते आपण रोज पाहतो. आतातरी मराठी माणसांनी डोळे उघडे ठेवायला हवेत. आपल्या शहरावर मोठा डाव खेळला जातोय.”






