Raj Thackeray | राज्यात मराठी भाषा, हिंदीच्या सक्ती आणि अमराठी व्यापाऱ्यांच्या वादावरून तापलेलं वातावरण पुन्हा एकदा उफाळून आलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ५ जुलैनंतर आता १८ जुलै रोजी मिरा रोडवर सभा घेणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. ही सभा मनसेच्या विजय आणि आभार सभेच्या स्वरूपात होणार आहे.
१८ जुलैची सभा का महत्त्वाची? :
मागील काही महिन्यांपासून हिंदी भाषेच्या विरोधात महाराष्ट्रात आंदोलने सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेने ८ मार्चला मिरा-भाईंदरमध्ये भव्य मोर्चा काढला होता, ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ५ जुलै रोजी मुंबईत मनसे-शिवसेना ठाकरे गटाचा संयुक्त विजय मेळावा पार पडला, ज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र उपस्थित होते.
मनसेच्या मोर्चाला मिळालेल्या प्रतिसादानंतर, १८ जुलै रोजी राज ठाकरे मिरा रोडमध्ये सभा घेणार आहेत. ही सभा केवळ आभार सभा नसून, आगामी संघर्षाची दिशा निश्चित करणारी ठरू शकते. या सभेत राज ठाकरे (Raj Thackeray) काय बोलतात, ते ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीकडे कोणती भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे.
राज ठाकरे पुन्हा मैदानात :
दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी मिरा-भाईंदर भागात एका मिठाई विक्रेत्याने मराठीत बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली होती. याच्या निषेधार्थ अमराठी व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला, ज्यावर मनसेने भाजपवर टीका करत हा मोर्चा मराठी माणसांना डिवचण्याचा कट असल्याचा आरोप केला होता.
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ८ मार्चला झालेल्या मनसे मोर्चाने जनतेचा ओघ दाखवून दिला. त्यानंतर आता राज ठाकरे पुन्हा मैदानात उतरले असून १८ जुलैची सभा निर्णायक ठरणार असल्याचे संकेत आहेत.






