Intrcity SmartBus | पुणे ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन सुविधा उपलब्ध झाली आहे. इंटरसिटी स्मार्टबसकडून या मार्गावर ‘स्मार्टबस.AQI’ सेवा सुरू करण्यात आली असून बसमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान बसवण्यात आले आहे. स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात प्रवासाचा अनुभव देणारी ही देशातील पहिली सेवा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
बसप्रवासात शुद्ध हवेचा नवा अनुभव :
दोन शहरांमधील लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान प्रवाशांना प्रदूषणमुक्त हवा मिळावी यासाठी IntrCity SmartBus ने पुणे-नागपूर आणि नागपूर-पुणे मार्गांवर ही सेवा सुरू केली आहे. ‘स्मार्टबस.AQI’ उपक्रमांतर्गत बसमध्ये अत्याधुनिक हवाशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे. प्रवास सुरू असताना बसमधील हवेची गुणवत्ता सातत्याने तपासली जाते आणि नियंत्रित ठेवली जाते. कंपनीच्या माहितीनुसार, प्रवासाच्या 90 टक्क्यांहून अधिक कालावधीत ‘PM 2.5’ पातळी सुमारे 40 µg/m³ इतकी राखली जाते, जी सामान्य शहरी हवेपेक्षा स्वच्छ मानली जाते.
कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात दोन शहरांदरम्यानच्या प्रवासात बाहेरील हवेतील प्रदूषणाची पातळी जागतिक आरोग्य संघटनेच्या (World Health Organization) मर्यादेपेक्षा दोन ते तीन पट जास्त असू शकते, असे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ‘रिस्पायरर लिव्हिंग सायन्सेस’ (Respirer Living Sciences) या हवामान तंत्रज्ञान कंपनीसोबत भागीदारी करून बसमध्ये रिअल-टाइम हवामापन आणि शुद्धीकरण प्रणाली बसवण्यात आली आहे.
Intrcity SmartBus | उद्घाटन व पुढील विस्ताराची योजना :
या सेवेचे उद्घाटन मोटार वाहन निरीक्षक श्रीपाद भागवत (Shripad Bhagwat) यांच्या हस्ते करण्यात आले. पुण्याहून नागपूरकडे रवाना होणाऱ्या पहिल्या बसला झेंडा दाखवत उपक्रमाची अधिकृत सुरुवात झाली. यावेळी कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष राठी (Manish Rathi) उपस्थित होते. त्यांनी या सेवेला आरोग्य, सुरक्षितता आणि आराम यांचा संगम साधणारा महत्त्वाचा टप्पा असे संबोधले.
प्रवाशांना ‘इंटरसिटी ॲप’ किंवा कंपनीच्या संकेतस्थळावर ‘स्मार्टबस.AQI’ टॅगद्वारे या बसची माहिती मिळेल. तसेच प्रवासादरम्यान बसमधील ‘रिअल-टाइम AQI’ आणि ‘PM 2.5’ पातळी पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या ही सेवा पुणे–नागपूर मार्गावर सुरू असून पुढील टप्प्यात राज्यातील इतर मार्गांवरही विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील आंतरशहरी बससेवेत तांत्रिक नवकल्पनांची भर पडल्याचे मानले जात आहे.






