Varandha Ghat | गेल्या काही दिवसांपासून कोकण आणि पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर, पुण्याहून कोकणाला जोडणाऱ्या वरंध घाट (Varandha Ghat) मार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वरंध घाट बंद
२० जून २०२५ पासून ते ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहे, त्यामुळे प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.
वरंध घाट मार्गावर पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता जास्त असते. मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने आणि आगामी काळात अतिवृष्टीचा अंदाज असल्याने या मार्गावर दरड कोसळण्याचा धोका आहे.
अतिवृष्टीचा अंदाज
यापूर्वीही या मार्गावर दरड कोसळणे, रस्ता खचणे, रस्त्याचा भराव वाहून जाणे, वाहनांचे अपघात घडून जीवित व वित्त हानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना टाळता येईल.
वरंध घाट मार्ग बंद असल्याने कोकणातून पुण्याला जाण्यासाठी राजेवाडी फाटा-महाड-माणगाव-ताह्मिणी घाट-पुणे या मार्गाचा वापर करता येईल. त्याचबरोबर, कोल्हापूरला जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळूण-कराड-कोल्हापूर या मार्गाने प्रवास करता येईल. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी मार्गांची खात्री करून घ्यावी आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाने केले आहे.






