Pune Municipal Corporation | राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांतील निकालांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) अचानक सक्रिय झाले असून, त्यांनी आपल्या पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना थेट आणि स्पष्ट सूचना दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून अनेक महापालिकांवर त्यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे. सत्तेत असलेले भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अनेक ठिकाणी परस्परविरोधात लढताना दिसले. मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निकालांमुळेच सर्वाधिक राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
का ठरली ही घडामोड महत्त्वाची? :
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांमध्ये अजित पवार यांनी महायुतीला बाजूला ठेवत थेट शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने राजकीय समीकरणे बदलली. यामुळे भाजप आणि अजित पवार गटात आरोप-प्रत्यारोप झाले, तर पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत तणावही उघड झाला. युतीतील नेते एकमेकांवर टीका करणार नाहीत असे जाहीरपणे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र वेगळंच चित्र दिसून आलं.
या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुण्यातील आपल्या नगरसेवकांशी संवाद साधत पुढील भूमिका स्पष्ट केली आहे. पुणेकरांनी आपल्याला विरोधी बाकावर बसण्याचा कौल दिला असून, त्यामुळे नगरसेवकांनी महापालिकेच्या कामकाजाचा सखोल अभ्यास करावा, शहराच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घ्यावी आणि नागरिकांची बाजू प्रभावीपणे सभागृहात मांडावी, असा संदेश त्यांनी दिला आहे.
Pune Municipal Corporation | निकालांचा काय झाला परिणाम? :
या सर्व राजकीय हालचालींचा थेट परिणाम निवडणूक निकालांवर दिसून आला. पुणे महापालिकेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं असून, पुणेकरांनी त्यांना स्पष्ट नकार दिल्याचं निकालातून समोर आलं. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची कामगिरी तुलनेने थोडी बरी असली, तरी भाजप हाच सर्वात मोठा पक्ष ठरला आणि 2017 प्रमाणेच यंदाही त्यांची ताकद कायम राहिली. (Pune Municipal Corporation News)
दरम्यान, अजित पवार सध्या पुण्यातच मुक्काम ठोकून असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या दृष्टीने हालचाली करत आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी, पुणे मनपातील घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण आकार घेत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.






