Saina Nehwal Retirement | भारताची स्टार शटलर (ndian badminton) सायना नेहवालने बॅडमिंटनमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक जिंकून इतिहास घडवणाऱ्या सायनाने आपल्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून दुखापतीशी झुंज देत असलेल्या सायनाने अखेर कोर्टपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.
सायनाने शेवटचा सामना 2023 मध्ये खेळला होता. त्यानंतर सततच्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती स्पर्धात्मक खेळात पुनरागमन करू शकली नाही. शरीर साथ देत नसल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं तिने स्पष्ट केलं असून, आपल्या अटींवर खेळ सुरू केला आणि त्याच अटींवर निरोप घेत असल्याचं तिने सांगितलं आहे. (Saina Nehwal Retirement)
Saina Nehwal Retirement | दुखापतीमुळे कठीण निर्णय :
सायनाने सांगितलं की, आता हाय इंटेन्सिटी ट्रेनिंग करणं तिच्यासाठी शक्य राहिलेलं नाही. गुडघ्याच्या वेदनांमुळे सातत्य राखणं अवघड झालं असून, त्यामुळेच निवृत्तीचा मार्ग निवडावा लागल्याचं तिने नमूद केलं. हा निर्णय भावनिक असला तरी योग्य वेळेत घेतल्याचं तिला वाटत असल्याचंही तिने सांगितलं.
35 वर्षीय सायनाने आपल्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले. दुखापतीनंतर पुनरागमन करण्याचा तिने वारंवार प्रयत्न केला, मात्र शरीराने साथ न दिल्यामुळे अखेर तिने बॅडमिंटनला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. तिच्या या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये भावनिक प्रतिक्रिया उमटत आहेत.
पदकांचा झगमगता प्रवास :
सायना नेहवालने 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक जिंकून भारतासाठी बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक पदक मिळवणारी पहिली खेळाडू होण्याचा मान मिळवला होता. याशिवाय, तिने विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकूण 18 मोठी पदकं जिंकली असून, भारतीय बॅडमिंटनच्या इतिहासात तिचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलं आहे.
तिने वर्ल्ड जूनियर चॅम्पियनशिपमध्ये सिल्व्हर आणि ब्राँझ पदक मिळवलं, एशियन चॅम्पियनशिपमध्ये तीन ब्राँझ, उबर कपमध्ये दोन ब्राँझ, कॉमनवेल्थ गेम्समध्ये तीन गोल्डसह पाच पदकं जिंकली. एशियन गेम्समध्ये दोन ब्राँझ आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एक सिल्व्हर व एक ब्राँझ पदक तिच्या खात्यात जमा आहे. (Saina Nehwal Retirement)
सायना 2015 मध्ये जगातील नंबर वन शटलर ठरली होती. तिला 2009 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2010 मध्ये मेजर ध्यानचंद पुरस्कार, 2010 मध्ये पद्मश्री आणि 2016 मध्ये पद्म भूषण या प्रतिष्ठित सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे. तिच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रीडाजगतात एका युगाचा शेवट झाला असल्याचं मानलं जात आहे.






