Pankja Munde | राज्यात नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांचे मतदान सुरू असताना परळी मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून परळीत तळ ठोकून प्रचार करत असून, त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. “आम्हाला बहीण-भाऊ म्हणणं बंद करा” या पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पंकजा मुंडे (Pankja Munde) यांनी सांगितले की गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी निवडणुकांसाठी नियोजन केलं असून, मुंबईतील कॅबिनेट बैठकी व्यतिरिक्त त्या परळीतच मुक्काम करत आहेत. परळीत शांततेत मतदान सुरू असून, कुणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“बहिण-भाऊ” संबोधनावरून वक्तव्य :
पंकजा मुंडे यांच्या या चर्चेत सर्वाधिक चर्चिले गेलेले विधान म्हणजे, “तुम्ही आम्हाला बहीण-भाऊ म्हणणं बंद करा. आम्ही बहीण-भाऊ आहोतच, पण केवळ तेच नाही.” पंकजांनी सांगितले की, धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नेते आहेत तर त्या भाजपच्या नेत्या आहेत. दोघांनीही राजकीय आयुष्यात मागील 20-22 वर्षे स्वतंत्रपणे काम केले असून, त्यामुळे फक्त कौटुंबिक नात्यावरून त्यांच्या राजकीय ओळखीला मर्यादा लावू नयेत.
राज्यभर ठिकठिकाणी महायुतीमध्ये या दोन्ही नेत्यांची राजकीय जुळवाजुळव दिसून येते. पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले की परळीत पॅनेल एकत्र उभे केल्याचा अर्थ हा केवळ राजकीय धोरणाचा भाग आहे, नातेसंबंधाचा नाही. “राजकारणात आम्ही स्वतंत्र भूमिका निभावतो आणि जबाबदाऱ्या पार पाडतो,” असेही त्यांनी नमूद केले.
Pankja Munde | खून कट आणि पैशांच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया :
खूनाच्या कटासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर पंकजा मुंडेंनी (Pankja Munde) प्रतिक्रिया देताना सांगितले की, “कोणीही काही बोललं तरी मी टीका करत नाही. अशा नकारात्मक गोष्टी माझ्यापर्यंत येऊ दिल्या जात नाहीत.” त्यांच्या वडिलांनी वाड्यातील वातावरणात नकारात्मक टिप्पणीपासून त्यांना दूर ठेवले आणि आजही कार्यकर्ते अशा गोष्टी त्यांच्या कानावर आणत नाहीत, असे त्या म्हणाल्या.
निवडणूक काळात पैशांचा व्यवहार किंवा जप्तीबद्दलच्या घटनांवरही पंकजांनी प्रतिक्रिया दिली. “काय घडलं, कुठे घडलं याची माहिती संबंधित व्यक्तींनाच असेल. निवडणूक आयोग योग्य ती कारवाई करेल,” असे त्या म्हणाल्या. त्यामुळे पैशांच्या मुद्द्यावर त्यांनी थेट उत्तर टाळत संतुलित भूमिका घेतली.






