Omraje Nimbalkar | राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांदरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी दिलासादायक आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटासाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर सोमवारी मातोश्री (Matoshree) येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
मनधरणीच्या बैठकीनंतर वाढला सस्पेन्स :
मिळालेल्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर रविवारी आपल्या धाराशिव (Dharashiv) मतदारसंघात कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते 22 जून रोजी मुंबई (Mumbai) येथे जाऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ शकतात. या भेटीदरम्यान ते आपली भूमिका आणि पक्षातील नाराजीची कारणे थेट पक्षप्रमुखांसमोर मांडणार असल्याचे सांगितले जात आहे.
शनिवारी मध्यरात्री ओमराजे निंबाळकर यांची आमदार वरुण सरदेसाई (Varun Sardesai) आणि आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांच्यासोबत तासाभराहून अधिक काळ चर्चा झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी त्यांची मनधरणी करत पक्ष सोडू नये, अशी विनंती केल्याचे समजते. यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
Omraje Nimbalkar | उद्धव ठाकरेंच्या निरोपानंतर निर्णयाची प्रतीक्षा :
ओमराजे निंबाळकर यांनी पक्षातच राहावे यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. आमदार कैलास पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, गेल्या 20 वर्षांपासून ज्या उद्दिष्टासाठी संघर्ष केला, त्याला न्याय मिळालेला नाही, अशी भावना ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांचा विशेष निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आला असून त्यानंतर त्यांनी निर्णयासाठी एक दिवसाची मुदत मागितली आहे.
दरम्यान, धाराशिव मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक कार्यकर्त्यांनी ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडू नये, अशी भूमिका मांडली आहे. काही कार्यकर्ते ओमराजे यांच्या निर्णयाच्या बाजूने उभे असले तरी मोठा वर्ग ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांचा अंतिम निर्णय काय असेल, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






