Rohit Arya Case | मुंबईच्या पवई परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनयाच्या नावाखाली जवळपास 17 चिमुकल्यांना एका व्यक्तीने खोलीत डांबून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना पवई येथील आर ए स्टुडिओमध्ये घडली असून आरोपीचे नाव रोहित आर्या (Rohit Arya Case) असे आहे. त्याने स्वतःचा व्हिडिओ शेअर करून या मुलांना ओलीस ठेवले असल्याची कबुली दिली.
गेल्या सहा दिवसांपासून या स्टुडिओमध्ये मुलांची ऑडिशन प्रक्रिया सुरु होती. परंतु आज दुपारी जेवणाच्या वेळी मुले बाहेर न आल्याने हॉटेल आणि परिसरातील लोकांना संशय आला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि काही वेळातच घटनास्थळी पोलिस, NSG कमांडो तसेच अग्निशमन दल दाखल झाले. रोहित आर्याला ताब्यात घेत मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
काय आहे रोहित आर्याची मागणी? :
रोहित आर्याने आपल्या सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून म्हटलं की, “मी आत्महत्या करण्याऐवजी या मुलांना ओलीस ठेवलं आहे. माझ्या काही साध्या, नैतिक मागण्या आहेत. मला काही लोकांशी बोलायचं आहे आणि त्यांच्याकडून उत्तरं हवी आहेत. मी कोणताही दहशतवादी नाही, मला पैसा नकोय, फक्त संवाद हवा आहे,” असं तो म्हणाला.
पुढे तो म्हणतो, “जर माझ्याशी कुणी चुकीचं वागलं किंवा मला प्रवृत्त केलं तर मी हे ठिकाण जाळून टाकेन. मला स्वतःचा जीव गेला तरी चालेल, पण या मुलांना मानसिक धक्का बसेल. त्यामुळे मला दोषी ठरवू नका, जे मला या टोकाला नेत आहेत तेच जबाबदार आहेत.”
Rohit Arya Case | 1 मेपासून सुरु होता रोहितचा संताप :
व्हिडिओमध्ये रोहित आर्याने सांगितलं की, तो 1 मेपासून सतत काही मागण्यांसाठी प्रयत्न करत होता. “मी अनेकदा अधिकाऱ्यांना भेटलो, विनंती केली, उपोषणही केलं. पण कोणी ऐकलं नाही. आजपासून मी तीव्र उपोषण सुरु केलं आहे. आता पाणी सुद्धा घेणार नाही,” असं त्याने स्पष्ट केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित आर्या एका वेब सीरिजसाठी मुलांचे ऑडिशन घेत असल्याचं सांगून पवई येथील आर ए स्टुडिओमध्ये मुलांना बोलावलं होतं. परंतु काही तासांनंतर त्याने दरवाजे बंद करून या मुलांना ओलीस ठेवले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं. सर्व मुले सुखरूप बाहेर काढली गेली आहेत.






