Mumbai News | दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत (Mumbai) जमावबंदी लागू करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र मुंबई पोलीस (Mumbai Police) यांनी याबाबत स्पष्टीकरण देत हे आदेश नव्याने जारी करण्यात आलेले नसून नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याचे सांगितले आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हे आदेश दर 15 दिवसांनी जारी केले जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत आदेश लागू :
सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) आणि अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांच्या समर्थनार्थ विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. दरम्यान, दिल्लीतील संसद मोर्चादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून संसद भवन (Parliament House) परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांना रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 23 जुलै 2026 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून 6 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक शांतता बिघडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच जीवित आणि मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
Mumbai News | मिरवणुकांवर निर्बंध, अनेक उपक्रमांना सूट :
या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या मिरवणुका काढण्यास बंदी असून लाऊडस्पीकर, ध्वनिवर्धक, वाद्यवृंद तसेच फटाके वापरण्यासही मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही मुंबई पोलिसांनी दिला आहे.
मात्र विवाह समारंभ, अंत्ययात्रा, कंपन्या आणि सहकारी संस्थांच्या वैधानिक बैठका, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, न्यायालये, दुकाने, कारखाने आणि नियमित व्यावसायिक कामकाज यांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. तसेच संबंधित झोनल पोलीस उपायुक्त किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्यास काही सभा किंवा मिरवणुकांना मंजुरी दिली जाऊ शकते. दरम्यान, मुंबई पोलिसांनी हे आदेश नियमित स्वरूपाचे असून त्यांचा दिल्लीतील आंदोलनाशी थेट संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.






