Mumbai Rains | मुंबई (Mumbai) शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुर्घटनांची मालिका सुरूच आहे. कुर्ला (Kurla) परिसरात जोरदार वाऱ्यामुळे मोठे झाड कोसळून 63 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुंबईतील पावसाशी संबंधित मृतांचा आकडा तीनवर पोहोचला असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुर्ल्यातील दुर्घटनेने हळहळ :
रविवारी दुपारच्या सुमारास कुर्ला पश्चिम भागातील कमानी (Kamani) परिसरातील नौपाडा (Naupada) येथे ही दुर्घटना घडली. महापालिका शाळेजवळ आणि गोम्स गाऊन बिल्डिंग (Gomes Gown Building) समोरील परिसरात अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला. त्यावेळी रस्त्यालगत असलेले एक भलेमोठे झाड उन्मळून समोरील दुकानावर कोसळले. त्या वेळी दुकानात असलेले 63 वर्षीय युनूस कुंदावाला (Yunus Kundawala) झाडाखाली अडकून गंभीर जखमी झाले.
घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून झाड हटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या युनूस कुंदावाला यांना उपचारासाठी फौझिया हॉस्पिटल (Fauzia Hospital) येथे नेण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून महापालिकेच्या व्यवस्थापनावरही नाराजी व्यक्त केली जात आहे.
Mumbai Rains | पावसामुळे मृतांचा आकडा तीनवर :
मुंबईतील सततच्या मुसळधार पावसामुळे गेल्या काही दिवसांत ही तिसरी जीवितहानी ठरली आहे. यापूर्वी चेंबूर (Chembur) येथे शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर साकीनाका (Sakinaka) परिसरात मॅनहोलमध्ये पडून 55 वर्षीय व्यक्तीचा जीव गेला. आता कुर्ल्यात झाड कोसळल्यामुळे आणखी एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने पावसामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या तीन झाली आहे.
दरम्यान, हवामान विभागाने 6 जुलैपर्यंत मुंबईसह संपूर्ण एमएमआर (MMR) परिसर, कोकण (Konkan) आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे तसेच समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. पालघर (Palghar), ठाणे (Thane), रायगड (Raigad), रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग (Sindhudurg), पुणे (Pune), सातारा (Satara) आणि नाशिक (Nashik) जिल्ह्यांच्या घाट परिसरातही मुसळधार पावसामुळे स्थानिक वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.






