Mumbai Latur Vande Bharat | महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्याला आता आणखी एक नवी वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच नांदेड–मुंबई आणि पुणे–नागपूर वंदे भारत एक्स्प्रेस जाहीर झाल्या होत्या. आता नव्याने सुरू होणारी ही गाडी थेट मुंबई–लातूर मार्गावर धावणार असून प्रवाशांचा प्रवास जलद, आरामदायी आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.
मुंबई–लातूर वंदे भारत एक्स्प्रेसचा मार्ग :
मुंबई–लातूर वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रारंभ सीएसएमटी (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून होईल. गाडीचे थांबे दादर, ठाणे, कल्याण, पुणे, कुर्डुवाडी, धाराशिव आणि लातूर येथे असतील.
सकाळी 6 वाजता सीएसएमटीहून सुटणारी ही गाडी दुपारी 1 ते 1.30 दरम्यान लातूरला पोहोचेल.
सध्या लातूर ते मुंबईचे 525 किमी अंतर पार करण्यासाठी रस्त्याने 11-12 तास तर साधारण एक्स्प्रेस रेल्वेने 9.30 तास लागतात.
मात्र, वंदे भारतमुळे हा प्रवास फक्त 7 ते 7.30 तासांमध्ये पूर्ण होणार आहे.
Mumbai Latur Vande Bharat | लातूर आणि धाराशिवकरांसाठी दिलासा :
लातूर हे धार्मिक, ऐतिहासिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून महत्त्वाचे शहर आहे. येथे सिद्धेश्वर-रत्नेश्वर मंदिर, विराट हनुमान मंदिर, उदगीर किल्ला, औसा किल्ला यांसारखी अनेक स्थळे आहेत. सोबतच लातूर हे देशातील सर्वात मोठे सोयाबीन व्यापारी केंद्र मानले जाते. (Mumbai Latur Vande Bharat)
यामुळे मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांशी जलद संपर्क होणे हे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. धाराशिवकरांनाही या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.
प्रवाशांची मागणी आणि सरकारचा निर्णय :
लातूरकरांकडून गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईला थेट जोडणाऱ्या गाडीची मागणी होत होती. जनप्रतिनिधी आणि प्रवासी संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर केंद्र सरकारने या मार्गाला हिरवा कंदील दिला आहे.






