Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. “कोणाचाही बाप आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच,” असा ठाम एल्गार त्यांनी नांदेड येथे केला. 29 ऑगस्ट रोजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या मोर्चातून मराठा समाजासाठी हा विजय मिळवून आणणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मुंबई मोर्चासाठी आवाहन – ‘शेवटची लढाई आहे’ :
नांदेड दौऱ्यावर आलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांशी संवाद साधताना या मोर्चाचे महत्त्व अधोरेखित केले. “आंदोलन कधी ठरवून यशस्वी होत नाही, आम्ही आमच्या ताकदीने आंदोलन करतो. 29 ऑगस्टचा मोर्चा हा शेवटचा लढा आहे, कोणीही घरी राहू नये,” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी कसलीही जहागीरदाराची औलाद असो, मराठ्यापुढे टिकू देणार नाही, असे ठामपणे सांगितले. मागील मोर्चाच्या तुलनेत या वेळी पाच पटीने जास्त मराठा बांधव सहभागी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (Maratha Reservation)
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून टिकाऊ आरक्षण मिळावे, यासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई मोर्चा निर्णायक ठरणार असून, “मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या आंदोलनातून आरक्षणाच्या लढ्याचा शेवट करून समाजाला न्याय मिळवून देण्याची त्यांची तयारी स्पष्ट दिसत आहे.
Manoj Jarange | प्रकृती बिघडली – डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला :
गेल्या काही दिवसांपासून सलग दौरे, भाषणं आणि बैठकांमुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. नांदेडमधील बैठकींच्या ताणामुळे त्यांना अस्वस्थता जाणवली. प्रकृती बिघडल्याचे समजताच नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तातडीने शासकीय विश्रामगृहात दाखल झाले आणि त्यांची प्राथमिक तपासणी केली. डॉक्टरांनी त्यांना सध्या विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात गेल्या काही वर्षांपासून वादग्रस्त ठरला आहे. आता 29 ऑगस्टचा मोर्चा हा या चळवळीतील टर्निंग पॉईंट ठरेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






