‘मला त्याच दिवशी सर्व लक्षात आलं होतं’; मनोज जरागेंनी सगळंच सांगितलं

On: February 15, 2025 1:57 PM
Manoj Jarange Patil
---Advertisement---

Manoj Jarange | भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या घरी भेट झाली. तब्बल साडेचार तास चाललेल्या या चर्चेमुळे मराठा समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या भेटीवर मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे यांचा सुरेश धस यांना थेट सवाल

मीडियाशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांनी या भेटीबाबत कठोर शब्दांत टीका केली. “क्रूर हत्या झाली, तरीही काहींना याचे काहीच वाटत नाही. पद मिळेल किंवा लाभ होईल म्हणून तुम्ही भेटता, हे अत्यंत चुकीचे आहे.” अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.

गुप्त बैठकीची माहिती बाहेर आणणाऱ्या व्यक्तीचे त्यांनी कौतुक केले. “त्या व्यक्तीने खऱ्या अर्थाने मराठा समाजाला जागं केलं आहे.” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, “हेलिकॉप्टर आष्टीला उतरलं, त्याच दिवशी सर्व लक्षात आलं होतं,” असे सूचक विधान करत त्यांनी अधिक संशय व्यक्त केला.

गुप्त बैठकीवर गंभीर आरोप

मनोज जरांगे यांनी गुप्तपणे झालेल्या या बैठकीवर आक्षेप घेत, “साडेचार तास गुप्त बैठक कशासाठी? हा खून दाबण्याचा प्रकार आहे का?” असा थेट सवाल उपस्थित केला.

त्यांनी पुढे धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत, “त्यांना काय झालं होतं? ते कोणत्या कोमात गेले होते? त्यांना भेटायचं होतं, पण का? ते समाजापेक्षा मोठे आहेत का?” असे प्रश्न उपस्थित केले. “बावनकुळे यांनीच बैठकीचे तपशील सांगितले आहेत, म्हणजे यात काहीतरी मोठे संशयास्पद आहे,” असेही त्यांनी सांगितले.

मनोज जरांगे यांनी सुरेश धस यांच्यावर तिखट शब्दांत हल्ला चढवला. “आम्ही त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून निर्धास्त झोपलो होतो, पण त्यांनी तर मानच छाटली,” असे त्यांनी खेदाने सांगितले.

तसेच, “संतोष अण्णांसाठी असंच भेटणार का?” असा संतप्त सवालही त्यांनी केला. “धस यांच्या मागे मुख्यमंत्री, खासदार, आमदार कोणीही नसताना ते निवडून आले, मात्र आता ते क्रूर व्यक्तीला भेटून आले,” असेही त्यांनी स्पष्ट केले. (Manoj Jarange)

मनोज जरांगे यांनी ही भेट संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाशी जोडली आणि गंभीर आरोप केले. “हा खून पचवणार असाल, तर तुमच्यासारखे महापापी नाहीत,” असे ते म्हणाले.  तसेच, “जर बावनकुळे मिटवून घ्या म्हणत असतील, तर धनंजय मुंडे 302च्या (हत्या कलम) प्रकरणात आहेत, असा याचा अर्थ होतो.” असे ते म्हणाले. शेवटी, जर संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबलं गेलं, तर त्यासाठी सुरेश धसच जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला.

News Title : Manoj Jarange Slams Suresh Dhas Over Secret Meeting with Dhananjay Munde

 

Join WhatsApp Group

Join Now