Manoj Jarange | मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून आघाडीवर असलेले मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. नुकतेच त्यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण केले होते. त्यानंतर सरकारने त्यांच्या सहा मागण्या मान्य करत थेट जीआर काढला. हा मराठा समाजासाठी मोठा विजय मानला जात असला तरी, जीआरच्या विश्वासार्हतेबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
“मीच मराठ्यांना ओबीसीत घालणार” :
संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार घेत असतानाच जरांगे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की – “माझा मुद्दा आरक्षण आहे. मीच मराठ्यांना ओबीसीमध्ये घालणार आहे. कोणी कितीही संभ्रम निर्माण केला तरी समाज माझ्यावर विश्वास ठेवतो. सरकारने सातारा गॅझेटबद्दल विलंब करायला नको. मी महिनोंमहिने थांबणार नाही.”
त्यांनी सरकारला थेट इशारा दिला की, मागण्या वेळेत पूर्ण न झाल्यास ते पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत.
Manoj Jarange | एकनाथ शिंदे आणि फडणवीसांबद्दल वक्तव्य :
जरांगे पाटलांच्या आंदोलनादरम्यान वारंवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यावर आरोप केले जात होते. मात्र, यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “शिंदे खूप चांगले माणूस आहेत, ते कधीही असे करू शकत नाहीत.” (Maratha Reservation GR)
राज्यात सध्या असा आरोप होत आहे की, शिंदे यांनीच देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvsis) यांचे पद धोक्यात आणण्यासाठी जरांगे यांच्या आंदोलनाला गुप्त पाठिंबा दिला होता. या संदर्भात राजकीय वातावरण अजूनही ढवळून निघाले आहे.
ओबीसी समाजात नाराजी :
मराठा आरक्षणासंदर्भातील जीआर काढल्यानंतर ओबीसी समाजात तीव्र संताप आहे. नागपूरसह राज्यातील अनेक भागात ओबीसी नेते व कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे राज्यातील आरक्षण प्रश्नावर तणाव वाढताना दिसत आहे.






