Maharashtra Weather Update | राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत असून आता पुन्हा एकदा थंडी वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत राज्यातील हवामानात मोठे बदल जाणवणार असून याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घसरण होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सध्या उत्तर भारतात कडाक्याची थंडी असून त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील थंडी कमी झाली होती, मात्र आता पुन्हा शीतलहरी सक्रिय होणार असल्याचे संकेत आहेत. हवामानातील या बदलांमुळे सकाळी व रात्री थंडी तर दुपारच्या वेळी उष्णतेचा अनुभव येणार असून हा तापमानातील फरक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर :
हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात तब्बल 4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण होऊ शकते. मराठवाड्यात सध्या तापमानात हळूहळू वाढ होत असली तरी पुढील काही दिवसांत पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे. यंदा मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी अनुभवायला मिळाली असून ती पुन्हा सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. (Maharashtra Weather Update)
राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद धुळ्यात झाली असून तेथे तापमान 9 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. गोंदिया येथे 9.8 अंश, तर यवतमाळ आणि परभणी येथे 10 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. सकाळी आणि रात्री थंडी जाणवत असली तरी दुपारच्या वेळी उकाडा वाढत असल्याने नागरिकांना हवामानातील तीव्र चढ-उतारांचा सामना करावा लागत आहे.
Maharashtra Weather Update | बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम :
हवामानातील सतत बदलांचा थेट परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तापमानातील अचानक घट-बढीमुळे सर्दी, खोकला, श्वसनाशी संबंधित समस्या तसेच अंगदुखी यांसारख्या तक्रारी वाढू शकतात. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असून योग्य कपडे घालणे आणि आरोग्याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Weather Update)
दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस हवामान स्थिर राहणार असून उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांत पुण्यात किमान आणि कमाल तापमानात वाढ झाली असून त्यामुळे उष्णतेचा अनुभव येत आहे. बदलत्या वातावरणासोबतच वायू प्रदूषणातही वाढ होत असल्याने श्वसनाशी संबंधित त्रास वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.






