Uddhav Thackeray | राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून, शिवसेना शिंदे गटासोबत युती करून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, महापौरपदावरून आता मोठा तिढा निर्माण झाला असून, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का देणारी घडामोड समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे काही नवनिर्वाचित नगरसेवक सध्या ‘नॉट रिचेबल’ झाले असून, ते एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. बहुमत असूनही विरोधी बाकावर बसण्याची इच्छा नसल्याने हे नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे मुंबई महापालिकेतील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महापौरपदावरून तणाव वाढला :
मुंबई महापालिकेत (Mumbai Mahapalika) भाजपला 89 तर शिवसेना शिंदे गटाला 29 जागा मिळाल्या आहेत. पहिल्यांदाच मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसण्याची शक्यता असतानाच, शिंदे गटाने अडीच वर्षे महापौरपद आपल्याकडे असावे, अशी अट घातल्याची माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाने आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना ताज लँड्स एंड परिसरातील हॉटेलमध्ये ठेवले असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनीही “देवाची इच्छा असेल तर आमचाच महापौर होईल,” असा दावा केला होता. मात्र, आता ठाकरे गटातीलच काही नगरसेवक संपर्कात नसल्यामुळे त्यांच्या गटात अस्वस्थता वाढल्याचे दिसत आहे.
Uddhav Thackeray | राष्ट्रवादीला मोठा फटका :
या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांची कामगिरी तुलनेने चांगली राहिली असून, एमआयएमनेही आश्चर्यकारक यश मिळवले आहे.
मात्र, अजित पवार गट आणि शरद पवार गट (sharad pawar group) अशा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आगामी काळात आणखी मोठे बदल पाहायला मिळू शकतात.






