Maharashtra Weather | देशात यंदा मान्सूनची वाटचाल अपेक्षेपेक्षा वेगाने सुरू झाली असून तो १३ मे रोजी अंदमान-निकोबार (Andaman-Nicobar) बेटांवर दाखल होणार आहे. त्यानंतर अवघ्या ५ दिवसांत मान्सून अरबी समुद्रात पोहोचणार असल्याचा नवा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) रविवारी जाहीर केला आहे.
अरबी समुद्र आणि केरळात लवकर पोहोचणार मान्सून-
हवामान विभागाच्या (Maharashtra Weather) माहितीनुसार, नैर्ऋत्य मान्सून १३ मेच्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्र, आग्नेय बंगालच्या उपसागरातील काही भाग आणि निकोबार बेटांवर सक्रिय होईल. त्यानंतर ४ ते ५ दिवसांत तो दक्षिण अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्रातही दाखल होण्याची शक्यता आहे.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मान्सून २३ ते २५ मेच्या दरम्यान केरळमध्ये (Kerala) दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्याने १२ ते १५ मेदरम्यान राज्यातील सर्व भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
राज्यात पावसाचा जोर आणि उकाड्यात घट-
महाराष्ट्रात (Maharashtra Weather) १५ मेपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, १२ मे म्हणजेच उद्याच्या दिवशी पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता आहे.
पुढील १५ दिवस म्हणजे २५ ते २६ मे पर्यंत होणाऱ्या पूर्वमोसमी पावसामुळे दिवसभराच्या जास्तीत जास्त तापमानासोबतच रात्रीच्या किमान तापमानातही घट होईल. त्यामुळे सध्या जाणवत असलेला असह्य उकाडा कमी होणार असून हवामान अधिक आल्हाददायक राहील.






