Pankaja Munde | भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी निवृत्तीचा विचार करत असल्याचे वक्तव्य केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने त्यांना भाजप सोडून पक्षात येण्याचे आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचे आवाहन केले आहे. या प्रस्तावामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
विजय वडेट्टीवार यांची थेट ऑफर :
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांना थेट राजकीय प्रस्ताव दिला. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या निधनानंतर ओबीसी नेतृत्वाला सातत्याने दुय्यम स्थान दिले जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. पक्षात न्याय मिळत नसल्यामुळेच पंकजा मुंडे यांच्या भावना व्यक्त होत असाव्यात, असे सांगत त्यांनी भाजपमधून बाहेर पडून स्वतंत्र नेतृत्व करण्याचे आवाहन केले. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची संधी मिळू शकते आणि त्यासाठी पक्ष पूर्ण सहकार्य करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र अशा निर्णयाबाबत अंतिम भूमिका पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच घेतली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
पंकजा मुंडे यांनी या ऑफरवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्यांच्या निवृत्तीच्या वक्तव्यामुळे आधीच राजकीय चर्चांना वेग आला असताना काँग्रेसकडून आलेल्या या प्रस्तावाने वातावरण आणखी तापले आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत उत्सुकता वाढली असून राज्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याच्या शक्यतांवर चर्चा सुरू झाली आहे.
Pankaja Munde | ओबीसी प्रश्न आणि सरकारवर टीका :
आजपासून विदर्भ (Vidarbha) विभागातील 11 जिल्ह्यांत मंडल यात्रा सुरू होत असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. या यात्रेत ओबीसी (OBC) समाजासाठी जातीनिहाय जनगणना, स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना, महाज्योती (Mahajyoti) संस्थेला लोकसंख्येच्या प्रमाणात एक हजार कोटी रुपयांचा निधी, एक लाख रिक्त पदांचा बॅकलॉग तातडीने भरणे आणि अर्थसंकल्पात ओबीसी समाजाला लोकसंख्येनुसार निधीची तरतूद करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने संपादित केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) संदर्भातही त्यांनी टीका करत मोठ्या कंत्राटदारांना लाभ मिळावा म्हणून कोट्यवधी रुपयांची कामे दिली जात असल्याचा दावा केला आहे.





