Maharashtra Weather | महाराष्ट्र (Maharashtra) मध्ये गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची गती मंदावल्याने बहुतांश भागांत पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे तापमानात वाढ होऊन उकाडाही जाणवत आहे. मात्र, 14 जुलैपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता असून हलक्या पावसासह विजांच्या कडकडाटाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मंगळवारी 9 जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज :
राज्यात मागील पाच दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून मान्सूनचा मुख्य पट्टा उत्तरेकडे सरकला आहे. त्यामुळे अनेक भागांत कमाल तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात असून उन्हाची तीव्रता आणि उकाडा वाढला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत असले तरी बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, मंगळवारपासून काही भागांत पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
14 जुलै रोजी कोकण (Konkan), उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा (Marathwada) मधील काही भागांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. पालघर (Palghar), रायगड (Raigad), नाशिक (Nashik) घाटमाथा, धुळे (Dhule), नंदुरबार (Nandurbar), जळगाव (Jalgaon), जालना (Jalna) आणि छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या सरी पडू शकतात. मात्र, उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे.
Maharashtra Weather | पुढील तीन दिवसांचा हवामानाचा अंदाज :
बुधवारी पूर्व विदर्भामधील (East Vidarbha) चंद्रपूर (Chandrapur) आणि गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यांसाठी विजांसह वादळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर, रायगड, पुणे (Pune), सातारा (Satara), नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर (Ahilyanagar), छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड (Beed), परभणी (Parbhani), हिंगोली (Hingoli) आणि नांदेड (Nanded) जिल्ह्यांसह सातारा व नाशिक घाटमाथ्यावर हलक्या पावसाची शक्यता आहे. इतर भागांत ऊन आणि ढगाळ वातावरण राहू शकत.
याशिवाय गुरुवारी बुलढाणा (Buldhana), वाशिम (Washim), यवतमाळ (Yavatmal) आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सातारा, सांगली (Sangli), नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर (Latur) जिल्ह्यांत हलक्या सरींचा अंदाज आहे.






