Kolhapur Crime | कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात एका महिन्याच्या बाळाच्या आईचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात मुलीच्या बारशाची तयारी सुरू असतानाच विवाहितेचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मृत महिलेच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर छळ आणि गंभीर आरोप केले असून पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे.
बारशाच्या तयारीत असतानाच घडली धक्कादायक घटना:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजारामपूर (Rajarampur) परिसरात ही घटना घडली. अस्मिता प्रतिकसिंह काटकर (Asmita Pratiksingh Katkar) यांचे दीड वर्षांपूर्वी प्रतिकसिंह काटकर (Pratiksingh Katkar) यांच्याशी लग्न झाले होते. रविवारी, 12 जुलै रोजी दुपारी राहत्या घरी त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे, त्यांच्या एका महिन्याच्या मुलीच्या बारशाची तयारी घरात सुरू होती. या घटनेमुळे कुटुंबासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान पंचनाम्यात अस्मिता यांच्या गळ्यावर काही जखमांच्या खुणा आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
माहेरच्यांचे छळाचे आरोप; पोलिसांचा तपास सुरू :
मृत महिलेच्या आई-वडिलांनी सासरच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, लग्नानंतर काही महिन्यांतच अस्मिताचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला होता. सासू, सासरे, पती आणि नणंद यांच्याकडून सातत्याने पैशांची मागणी केली जात होती, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच सासरच्या मंडळींना मुलाची अपेक्षा होती आणि त्यासाठी आधीच मुलासाठी लागणारे निळ्या रंगाचे कपडे खरेदी करण्यात आले होते. मात्र मुलगी झाल्यानंतर अस्मितावरील छळ अधिक वाढल्याचा आरोपही माहेरच्यांनी केला आहे.
अस्मिताच्या आईने असा दावा केला की, डोहाळे जेवणासाठी सुमारे दोन लाख रुपये, बाळंतपणासाठी 77 हजार रुपये, अधिक मासासाठी 30 ते 35 हजार रुपये देण्यात आले. याशिवाय 52 हजार रुपयांचा पाळणा खरेदी करण्यासाठीही माहेरकडून पैसे मागण्यात आले होते. आगामी 15 ऑगस्ट रोजी बारशाचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून त्यासाठीही पैशांची मागणी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच अस्मिताला स्वतःच्या मोबाईलवरून माहेरी बोलू दिले जात नव्हते आणि सासूच्या फोनवर स्पीकर सुरू ठेवूनच संवाद साधावा लागत होता, असेही माहेरच्यांनी म्हटले आहे. अस्मिताने आत्महत्या केलेली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करत दोषींवर कठोर कारवाई करून न्याय मिळावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून कोल्हापूर पोलिस (Kolhapur Police) पुढील तपास करत आहेत.






