Weather Alert | महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील हवामानात मोठे बदल होत असून येत्या दोन दिवसांत अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. नवरात्रोत्सवाला (Navratri 2025) सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पावसाचे सावट दिसत असून शेतकऱ्यांच्या पिकांवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीचा इशारा :
हवामान खात्याच्या माहितीनुसार 24 तासांत मराठवाड्यात (Marathwada) तर 24 ते 27 सप्टेंबरदरम्यान विदर्भात अतिवृष्टी होऊ शकते. 25-26 सप्टेंबर रोजी चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे हवामानात मोठे बदल होऊन पावसाची तीव्रता वाढेल. या पावसामुळे सोयाबीन, कापूस, हळद आणि कांदा पिकांचे मोठे नुकसान होईल अशी भीती आहे. (Maharashtra Weather Alert)
पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरात आजपासून मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. पुढील तीन दिवसांत या भागातील पावसाची तीव्रता हळूहळू कमी होईल, तरी सुरुवातीला वादळी वाऱ्यासह मुसळधार सरी कोसळतील. याशिवाय घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र आणि तळ कोकण (Kokan Rain) भागातही पावसाचा जोर दिसणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार,अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तास पावसाचा इशारा दिला आहे.
Weather Alert | शेतकऱ्यांचे मोठे नुकसान आणि मदतीची मागणी :
सोलापूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश पावसामुळे शेतांमध्ये व घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. अनेक पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे करण्याची मागणी होत आहे. हळद आणि कांद्याच्या लागवडीला अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. (Maharashtra Weather Alert)
दरवर्षी सप्टेंबर अखेरीस मान्सून माघारीचा प्रवास सुरू होतो. मात्र, यावर्षी हवामानातील बदलांमुळे मान्सूनचा परतीचा प्रवास उशिरा सुरू होईल. 5 ते 10 ऑक्टोबरदरम्यान महाराष्ट्रातून मान्सून माघार घेण्याची शक्यता असून अजून काही दिवस राज्यात पावसाचे वातावरण कायम राहणार आहे.






