Maharashtra Reservation Row | मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटचा जीआर काढून मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग मोकळा केला. या निर्णयामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण असले तरी ओबीसी समाजाने त्याला जोरदार विरोध दर्शवला आहे. “मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, पण ओबीसीमधून नको,” असा ठाम सूर ओबीसी नेत्यांकडून उमटला आहे.
बंजारा समाजाचा इशारा :
मराठा–ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर आता बंजारा समाजही (Banjara ST Quota) आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. बीड शहरात झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत बंजारा समाजाने हैदराबाद गॅझेटनुसार स्वत:ला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी केली. याच मुद्द्यावरून त्यांनी 15 सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय, बीड असा विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Reservation Row)
बंजारा समाजाने स्पष्ट इशारा दिला आहे की, “आमच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवा, अन्यथा महाराष्ट्रातील सगळे रस्ते बंद करू.” या इशाऱ्यानंतर आधीच आरक्षणाच्या प्रश्नामुळे तापलेल्या राज्यात तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Maharashtra Reservation Row | ओबीसी–मराठा–बंजारा आमनेसामने :
सध्या परिस्थिती अशी आहे की, एकीकडे मराठा समाज हैदराबाद गॅझेट लागू झाल्यामुळे आनंदी आहे, तर दुसरीकडे ओबीसी समाज न्यायालयीन लढाईची तयारी करत आहे. त्यातच बंजारा समाजाने एसटी आरक्षणासाठी लढा सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे राज्यात आरक्षणाचा मुद्दा त्रिकोणी संघर्षात परिवर्तित होऊ शकतो. (Banjara ST Quota)
आरक्षणाच्या या वणव्यामुळे राज्यातील राजकीय पक्षांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मराठा समाज, ओबीसी समाज आणि आता बंजारा समाज यांच्या मागण्यांमध्ये समतोल साधणे हे सरकारसाठी कठीण ठरणार आहे. येत्या काही दिवसांत मोर्चा, आंदोलने आणि न्यायालयीन लढाया सुरू राहिल्यास राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघेल.






