Maharashtra Rain Alert | महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरी कोसळण्याचा इशारा दिला आहे. (Maharashtra Rain Alert)
राज्यात गेल्या काही दिवसांत काही ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली असली तरी, काही जिल्ह्यांत मात्र पाऊस अद्यापही कायम आहे. विशेषतः पुणे, पंढरपूर व खडकवासला परिसरात चांगल्या पावसाची नोंद झाली असून धरणांमधील विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या भागांमध्ये सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे.
हवामान खात्याचा इशारा कोणत्या जिल्ह्यांसाठी? :
भारतीय हवामान विभागाने विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.
त्याचबरोबर मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड या भागांमध्ये देखील हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरी चालू राहण्याची शक्यता आहे. (Maharashtra Rain Alert)
Maharashtra Rain Alert | धरणांतून विसर्ग, नद्यांचा पाणीपातळी वाढतेय :
पुण्यातील खडकवासला (Khadakwasla) धरणातून सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच पंढरपूर परिसरात देखील पावसामुळे नदी पातळी वाढत आहे. याशिवाय विदर्भात नद्यांमध्ये पाणी भरले आहे, काही भागांचा संपर्कदेखील तुटला होता त्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील काही भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष आता या पुढील २४ तासांकडे लागले आहे. यलो अलर्ट असल्यामुळे हवामान खात्याच्या सूचना आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.






