LPG Cylinder Booking Rule | पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतातील एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केला असून ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळे नियम लागू केले आहेत. या निर्णयामुळे गॅसची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
नव्या नियमांनुसार ग्रामीण भागातील ग्राहकांना आता 45 दिवसांनंतरच पुढील सिलेंडर बुक करता येणार आहे. तर शहरी भागात सिलेंडर बुकिंगसाठी 25 दिवसांचे अंतर ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. ही माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री Hardeep Singh Puri यांनी संसदेत दिली.
ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळे नियम :
यापूर्वी देशभरात एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी साधारण 21 दिवसांचे अंतर ठेवण्याचा नियम होता. काही दिवसांपूर्वी तो वाढवून 25 दिवस करण्यात आला होता. आता मात्र ग्रामीण भागासाठी हा कालावधी थेट 45 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. सरकारच्या मते, या निर्णयामुळे अचानक वाढणारी मागणी नियंत्रित होईल आणि पुरवठा व्यवस्थापन अधिक सुलभ होईल.
अलीकडच्या काळात गॅस टंचाईच्या अफवांमुळे अनेक ग्राहक गरजेपेक्षा लवकर सिलेंडर बुक करू लागले होते. जे ग्राहक पूर्वी सुमारे 50 ते 55 दिवसांनी बुकिंग करत होते, ते आता केवळ 15 दिवसांच्या अंतराने सिलेंडर बुक करत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे साठेबाजी आणि काळाबाजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती.
LPG Cylinder Booking Rule | संसदेत सरकारची स्पष्ट भूमिका :
लोकसभेत या विषयावर चर्चा होत असताना राहुल गांधी यांनी एलपीजी पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली. त्यांनी काही भागात रेस्टॉरंट बंद होत असल्याचे आणि लहान व्यावसायिकांना अडचणी येत असल्याचे मुद्दे उपस्थित केले.
यावर उत्तर देताना हरदीप सिंह पुरी यांनी देशात पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की भारत अनेक देशांकडून कच्चे तेल खरेदी करत असल्यामुळे ऊर्जा पुरवठा सुरक्षित आहे. तसेच गेल्या काही दिवसांत एलपीजी उत्पादनात 28 टक्क्यांनी वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (LPG Cylinder Booking Rule News)
सरकारच्या मते, देशातील सुमारे 33 कोटी कुटुंबांना एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवणे ही प्राथमिकता आहे. त्यामुळे अफवा आणि साठेबाजी रोखण्यासाठीच सिलेंडर बुकिंगमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.






