Ladki Bahin Yojana | महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरू झाल्यापासून महिलांना दरमहा 1500 रुपयांचा आर्थिक लाभ दिला जात आहे. राज्यभरातील तब्बल 2 कोटींपेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. मात्र आता या योजनेसंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाभ सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक पात्र महिलेला ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भात सोशल मीडियावर ट्विट करत स्पष्ट केले आहे की, 18 नोव्हेंबर 2025 ही e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे. म्हणजेच या तारखेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास लाभ थांबण्याची शक्यता आहे.
ई-केवायसी प्रक्रिया का महत्त्वाची? :
महिला व बालविकास मंत्रालयानुसार, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणि नियमित आर्थिक लाभ सुनिश्चित करण्यासाठी e-KYC सुविधा सुरू करण्यात आली आहे.”
ही सुविधा 18 सप्टेंबर 2025 पासून सुरू असून, दोन महिन्यांचा कालावधी लाभार्थींना देण्यात आला आहे. बहुतांश महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली असली, तरी काही महिलांनी अद्याप केली नाही. त्यामुळे सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की 18 नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे.
Ladki Bahin Yojana | e-KYC प्रक्रिया कशी पूर्ण कराल? :
– सर्वप्रथम ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या.
– लॉगिन करून “e-KYC प्रक्रिया पूर्ण करा” या पर्यायावर क्लिक करा.
– आपला आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड भरा.
– नोंदणीकृत मोबाईलवर आलेला OTP टाका.
– जात प्रवर्ग निवडून आवश्यक Declaration भरा.
– शेवटी “Submit” क्लिक केल्यावर “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
“उर्वरित सर्व पात्र लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करावी,” असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रक्रियेच्या माध्यमातून सरकार योजनेत अधिक पारदर्शकता आणण्याच्या प्रयत्नात आहे.






